तीन धरणाच्या कुशीतील बोरखेडी तहानलेलेच
By Admin | Updated: April 9, 2016 02:24 IST2016-04-09T02:24:13+5:302016-04-09T02:24:13+5:30
मदना (वरफाटा), मदन उन्नई व आंजी-बोरखेडी या तीन धरणाच्या कुशीतील बोरखेडी गावात सात-आठ दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट आहे.

तीन धरणाच्या कुशीतील बोरखेडी तहानलेलेच
गावकऱ्यांची पाण्याकरिता भटकंती
आकोली : मदना (वरफाटा), मदन उन्नई व आंजी-बोरखेडी या तीन धरणाच्या कुशीतील बोरखेडी गावात सात-आठ दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट आहे. मिळेल तिथून पाणी आणण्याकरिता ग्रामस्थ धडपड करीत आहेत; परंतु या गंभीर प्रश्नाकडे वेळ देण्याकरिता तालुका प्रशासनाला वेळच नसल्याचे दिसून आले आहे.
बोरखेडी हे आदिवासीबहुल गाव मदना गटग्रामपंचायतीत येत असून आर्वी, सेलू व कारंजा सीमेवर आहे. आर्वी पंचायत समितीतील या गावातील नागरिकांना ६० कि़मी. प्रवास करूनच पंचायत समिती गाठावी लागते. त्यामुळे या गावाची हाक पंचायत समिती प्रशासनाच्या कानावर जातच नाही. तीन धरणाच्या संगमावर असलेल्या गावाच्या सभोवताल पाणी आहे; मात्र गावकरी घोटभर पाण्यासाठी तडफडत आहेत.
गावात जलकुंभ आहे. येथील विंधन विहिरीतून पाणी जलकुंभात घेवून गावाची तृष्णातृप्ती होत होती. मात्र गत आठ दिवसांपासून बोरवेलला पाणी नसल्याने जलकुंभात येणार कुठून, गावात हातपंप आहे, ते ही कोरडे ठण झाले. गावकऱ्यांसमोर एप्रिल महिन्यातच पाण्याचे संकट उभे ठाकले. येत्या तीन महिन्यात याहीपेक्षा बिकट स्थिती येण्याचे संकेत आहेत. गावात गोधन मोठ्या प्रमाणात आहे. गावाला लागूनच धरण असल्यामुळे गुरांच्या पाण्याचा प्रश्न नाही.
गावातील पाणी टंचाई संबंधात माहिती घेण्याकरिता ग्रामसेवक, आर्वी विस्तार अधिकारी (पंचायत) चव्हाण तसेच गटविकास प्रवीण वानखेडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा मोबाईल नॉट रिचेबल दाखवित होता.(वार्ताहर)