अंधारात राहून दुसऱ्यांची घरे उजाळणारे पणती कारागीर
By Admin | Updated: October 28, 2016 01:39 IST2016-10-28T01:39:15+5:302016-10-28T01:39:15+5:30
कोणताही सण आनंद व उत्साहाचे प्रतिक असतो. दिवाळी हा सण आपल्या जीवनात सुख समाधान आणत असतो;

अंधारात राहून दुसऱ्यांची घरे उजाळणारे पणती कारागीर
बाजारात पणत्यांची आरास : शिक्षणाचा गंध नाही की, जेवणाची भ्रांत नाही
वर्धा : कोणताही सण आनंद व उत्साहाचे प्रतिक असतो. दिवाळी हा सण आपल्या जीवनात सुख समाधान आणत असतो; पण शहरातील मुख्य मार्गावर आपल्या कुटुंबासह मातीच्या मूर्त्या व दिवे विकणाऱ्या लोकांसाठी हा पर्व संघर्षमय असतो. दुसऱ्यांची घरे उजळण्यासाठी दिवसरात्र श्रम करीत धडपडणाऱ्या या लोकांच्या घरात खरा प्रकाश पोहोचतच नाही. तुटपुंज्या मिळकतीत समाधान माणून या लोकांच्या पिढ्या जीवन कंठत आहेत.
सणानिमित्त जेवढी कमाई होत असेल तेवढी कमाई करावी व दोन वेळचे जेवण मिळू शकेल. आपल्या संपूर्ण कुटुंबासह वेगवेगळ्या ठिकाणी विस्थापितांचे जीवन जगणाऱ्या या कुटुंबातील मुलांना हे देखील माहिती नसते की, दिवाळी काय असते. मोठे साहित्य विकत आहेत, म्हणून आम्हीही दोन पैसे कमविण्यासाठी बसलो आहे, असे ते सांगतात. आज सायंकाळी आपल्या मुलांना भरपेट जेवण मिळेल याचा आनंद या विक्रत्यांच्या चेहऱ्यावर झळकत असतो. सोबतच मुलांच्या चेहऱ्यावरही आनंद दिसून येतो. तो आनंद व प्रकाश दिव्याच्या उजेडापेक्षा कित्येक पट अधिक असतो. दिव्यांचा हा सण देशात उत्साहात साजरा केला जातो. या सणानिमित्त खरेदीही मोठ्या प्रमाणावर करण्यात येते. शहराच्या मुख्य मार्गावर संपूर्ण कुटुंबासह फाटलेल्या चादरीवर मातीचे दिवे व मूर्ती ठेवून विकणारे कुटुंब काही न सांगता खूप काही सांगून जातात. त्यांच्याशी संपर्क साधल्यावर ते प्रारंभी पोलिसांचा ससेमिरा, त्या जागेवरून हटविणार तर नाही ना, असे विविध प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होतात.
पैसे कमविण्यासाठी खूप मेहनत करीत मुलेही साहित्याच्या बाजूला बसलेले असतात. दोन-तीन गठ्ठ्यांत संपूर्ण कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साहित्य साठवून हे लोक प्रत्येक सणाला वेगवेगळ्या शहरात जातात. शिक्षण काय असते, हे यांच्या मुलांना माहिती नसते. केवळ जगण्यासाठी काम करून संघर्षमय जीवन जगणे हेच त्यांना माहिती आहे. हे साहित्य विक्री केल्यास आपल्याला जेवण मिळणार या आशेने ते रस्त्यावरील ग्राहकांना आवाज देत त्यांना वस्तू घेण्यास प्रवृत्त करीत मालाची विक्री करताना दिसतात. इतरांसारखे दिवाळीच्या सायंकाळी त्यांच्या घरी उजेड काय तो असेल; पण त्यांचे जीवनच उघड्यावर आहे. पणती विकल्यावर हे किती रुपये कमवित असतील, यात ते चांगले जगू शकतील काय, हा प्रश्नच आहे.(कार्यालय प्रतिनिधी)