बळीराजा उन्हाळवाहीत व्यस्त
By Admin | Updated: April 30, 2016 02:24 IST2016-04-30T02:24:22+5:302016-04-30T02:24:22+5:30
खरीप व रबी असे दोन हंगाम बळीराजाकरिता महत्त्वाचे असतात. नुकताच रबी हंगाम संपल्याने येणाऱ्या खरीप हंगामाची पूर्वतयारीला प्रारंभ झाला आहे.

बळीराजा उन्हाळवाहीत व्यस्त
खरीप हंगामाची तयारी : मशागतीचे काम ट्रॅक्टरच्या सहाय्याने
घोराड : खरीप व रबी असे दोन हंगाम बळीराजाकरिता महत्त्वाचे असतात. नुकताच रबी हंगाम संपल्याने येणाऱ्या खरीप हंगामाची पूर्वतयारीला प्रारंभ झाला आहे. उन्हाळवाहीच्या कामात बळीराजा व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.
शेतमालाला योग्य भाव मिळाण्याची कायम प्रतीक्षा करीत असलेल्या बळीराजाला सूर्योदय व सूर्यास्त शेताच्या बांधावरच पाहावा लागतो. रखरखत्या उन्हात शेतातील कामे उरकण्यासाठी जीवाचा आटापीटा करावा लागत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात खरीप हंगामाची पेरणी झाल्यानंतर उगवणारे पीक जनावरे येवू नये म्हणून धुऱ्यावर कुंपण करण्यासाठी बोरीच्या झाडाच्या काट्या तोडून फास लावणे, शेतीची नांगरणी करणे, शेतातील केरकचरा वेचणे, बांधावरील तण नाहीशे करणे, शेत खत टाकणे आदी कामे अवघ्या दोन महिन्यात आटोपणे गरजेचे असते. त्यातच लग्नसराई असल्याने यात विलंब होतो. उष्णतामान वाढत असले तरी शेतात राबावेच लागत असल्याने शेतकरी त्याची बैलजोडी घेऊन शेताकडे जाताना दिसतो.
अवघ्या एक महिन्यावर रोहिणी नक्षत्र आले आहे. उन्ह, वारा, पाऊस यात बळीराजाला काम करावेच लागते. नापिकी आली तरी, अतिवृष्टीने पीक गेले तरी आणि कर्जबाजारी झालो तरी शेती करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. येणारा दिवस हा आमच्यासाठी चांगला दिवस येईल, अशी आशा ठेवून शेतकरी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येते. शेताची मशागत करण्यासाठी परिसरात वखरणीचे काम सुरू झाले आहे. यानंतर बळीराजाची आस वरुणराजाच्या आगमनाकडे असणार आहे.(वार्ताहर)
रोहिणी नक्षत्र महिनाभरावर
बैलजोडीच्या वाढलेल्या किंमती पाहता बहुतांश शेतकऱ्यांजवळ बैलजोडी नाही. त्यामुळे उन्हाळवाहीचे कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली जात आहे.
नांगरणी, वखरणी, धुरळणी ही कामे सध्या अंतिम टप्प्यात आहेत. रोहिणी नक्षत्र महिनाभरावर असल्याने मशागतीचे कामे आटोपणे गरजेचे आहे. याकरिता शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.
पारंपरिक साधनांसह आता शेतीकरिता यंत्रसामग्रीचा वापर केला जातो. यामुळे श्रमाची बचत होत असली तरीही लागवडीच्या खर्चात मात्र वाढ होत असल्याचे बोलले जाते.
शेणखतासाठी करावी लागते भटकंती
शेतातील पीक सकस व भरघोस येण्यासाठी तसेच अधिकाधिक उत्पन्न होण्यासाठी शेतकरी खत देतो. यातून दोन पैसे पदरात पडावे व शेताची पोत कायम राखण्यासाठी शेणखताची आवश्यकता असते. पण जनावरांची संख्या कमी होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना जिल्ह्याबाहेर जाऊन शेणखत आणावे लागत आहे. शेतकरी शेणखतासाठी भटकंती करीत असून यात खर्चही अधिक होत आहे.