धाम नदीला बेशरमचा विळखा

By Admin | Updated: February 8, 2016 02:18 IST2016-02-08T02:18:47+5:302016-02-08T02:18:47+5:30

जलस्रोतांचे बळकटीकरण करण्यासाठी शासनाकडून जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. तत्पूर्वी नदी स्वच्छता अभियानही राबविण्यात आले;

Bhaashram block on the river Dham | धाम नदीला बेशरमचा विळखा

धाम नदीला बेशरमचा विळखा

स्वच्छता अभियान कागदावरच : जलसाठ्यावरही संकट
वर्धा : जलस्रोतांचे बळकटीकरण करण्यासाठी शासनाकडून जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. तत्पूर्वी नदी स्वच्छता अभियानही राबविण्यात आले; पण या दोन्ही योजना जिल्ह्यातील नद्यांना शिवल्याच नसल्याचे वास्तव आहे. यामुळेच जनतेची तृष्णा भागविणाऱ्या वर्धा, वणा, धाम व अन्य नद्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्या आहेत. धाम नदीच्या पात्रात तर सर्वत्र बेशरमचेच राज्य असल्याचे दिसून येते.
केंद्र शासनाच्यावतीने नद्या स्वच्छ करण्यासाठी अभियान सुरू करण्यात आले होते. गंगा नदी स्वच्छ करीत असतानाच या अभियानाचा बोजवारा उडाला. यानंतर राज्यात जलस्त्रोत बळकट करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. यात नाला खोलीकरण व सरळीकरण तसेच तलावाच्या खोलीकरणाची कामे हाती घेण्यात आली. वर्धा जिल्ह्यातही जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अनेक गावांत नाला सरळीकरणाची कामे करण्यात आली; पण कुठेही नद्यांच्या स्वच्छतेकरिता पुढाकार घेतल्याचे दिसून आले नाही.
धाम नदीच्या स्वच्छतेकरिता पवनार ग्रा.पं. ने पुढाकार घेतला; पण तोही औटघटकेचाच ठरला. वर्धा नदीच्या स्वच्छतेची मोहिमही हाती घेतली होती; पण त्याचाही बोजवाराच उडाला. खरांगणा (मो.) येथेही धाम नदीचे पात्र स्वच्छ करण्याचा प्रयत्न झाला; पण तोही अपूराच ठरला. किमान जिल्ह्यातील मुख्य नद्या स्वच्छ होणे गरजेचे असताना प्रशासकीय स्तरावर कुठलेही प्रयत्न होताना दिसत नाही. पाटबंधारे विभाग जिल्हा व स्थानिक प्रशासनाकडे बोट दाखवित असल्याचे दिसते. नदी स्वच्छता अभियान राबविताना सामूहिक प्रयत्न गरजेचे असताना त्या दृष्टीने कुणीही विचार करताना दिसत नाही. यामुळे जिल्ह्यातील नद्यांचे पात्र बकाल झाले आहे. याकडे लक्ष देत पुढाकार घेणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)

दूषित पाण्याचा होतो पुरवठा
धाम नदी ही जिल्ह्यातील बहुतांश भागाची तहाण भागविणारी नदी म्हणून ओळखली जाते. पिपरी येथील पाणी पुरवठा योजनेसाठी येळाकेळी आणि पवनार येथील पम्प हाऊस येथून पाणी घेतले जाते. शिवाय यात वर्धेत जलशुद्धीकरण केंद्र असले तरी अनेक गावांतही याच नदीतील पाण्याचा पुरवठा होतो. ग्रामीण भागात जलशुद्धीकरण केंद्र नाही. यामुळे ग्रामस्थांना बेशरम, लव्हाळ्यांसह अन्य वनस्पतींमुळे दूषित झालेले पाणीच पिण्याकरिता वापरावे लागते. किमान गाव, शहरांतील स्थानिक स्वराज्य संस्थांनी तरी आपापल्या क्षेत्रात येणारे नदी पात्र स्वच्छ केले तर संपूर्ण नदी स्वच्छ होण्यास वेळ लागणार आहे. यासाठी कुणी एकाचा पुढाकार गरजेचा आहे.

Web Title: Bhaashram block on the river Dham

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.