भेसळयुक्त खवा व पनीरपासून व्हा सावध; घरच्याघरी अशी ओळखा भेसळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2021 07:05 AM2021-10-30T07:05:00+5:302021-10-30T07:05:01+5:30

Wardha News भेसळयुक्त खवा आणि पनीरचे सेवन केल्यास पोटाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे या दिवसात प्रत्येक व्यक्तीने दक्ष राहूनच विविध खाद्यपदार्थ्यांची खरेदी केली पाहिजे.

Beware of adulterated khowa and paneer; Identify such adulteration at home | भेसळयुक्त खवा व पनीरपासून व्हा सावध; घरच्याघरी अशी ओळखा भेसळ

भेसळयुक्त खवा व पनीरपासून व्हा सावध; घरच्याघरी अशी ओळखा भेसळ

Next
ठळक मुद्देसेवन केल्यास होऊ शकतो पोटाचा त्रास


वर्धा: दिवाळीच्या औचित्य साधून मिठाईच्या मागणीत वाढ होते; पण याच संधीचे सोने भेसळखोर करीत असून, भेसळयुक्त खवा आणि पनीरचे सेवन केल्यास पोटाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे या दिवसात प्रत्येक व्यक्तीने दक्ष राहूनच विविध खाद्यपदार्थ्यांची खरेदी केली पाहिजे.

विविध मिठाईची निर्मिती करताना खव्याचा वापर केला जातो. तर काही व्यक्ती पनीरचे विविध खाद्यपदार्थ तयार करतात. पण भेसळयुक्त खव्यासह पनीर मनुष्याच्या आरोग्यासाठी हानिकारकच असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. मोठा नफा मिळविण्यासाठी तसेच खाद्यपदार्थ आकर्षक दिसावे यासाठी बहुदा भेसळ केली जाते. वर्धा जिल्ह्यात कुठल्याही परिस्थितीत भेसळयुक्त खवा व पनीरचा वापर होऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेण्याची गरज आहे.

घरच्या घरी ओळखा भेसळ
 खवा शुद्ध आहे की नाही हे ओळखण्यासाठी थोडा खवा हातावर घेऊन घासून बघावा. खव्याचा पोत दाणेदार असला, तो हातावर चोळल्यानंतर हात तेलकट झाले आणि हाताला शुद्ध तुपासारखा सुगंध आला म्हणजे खवा शुद्ध आहे हे समजावे.

 शुद्ध खवा ओळखण्याची दुसरी पद्धत अशी आहे की, एक चमचा खवा घ्यावा, तो एक कप गरम पाण्यात मिसळावा. नंतर कपामध्ये आयोडिनचे काही थेंब टाकावेत. आयोडिन टाकल्याने गरम पाण्यात मिसळलेला खवा जर निळा झाला तर त्यात स्टार्चची भेसळ झाली आहे हे समजावे.
 पनीरचा एक तुकडा घेऊन तो चोळून पाहावा. चोळल्यानंतर त्या पनीरचे लगेचच बारीक तुकडे व्हायला लागले. तर समजावे की पनीर भेसळयुक्त आहे.

 पनीर पाण्यात उकळून थंड करावे. थंड झाल्यानंतर त्यातल्या एका तुकड्यावर आयोडिन टिंचरचे काही थेंब घालावेत. त्यानंतर पनीरचा रंग निळा झाला, तर ते पनीर बनावटी असल्याचे समजावे.

तर वाढू शकतो पोटाचा त्रास
भेसळयुक्त खवा, पनीर पदार्थ लोकांना विकणे हा गुन्हा असला तरी अनेक व्यक्ती मोठा नफा मिळविण्यासाठी भेसळीचा गोरखधंदा करतात. भेसळयुक्त खाद्यपदाथार्चे सेवन केल्यास कर्करोग, मूत्रपिंड, पोटदुखी, अपचन, त्वचेवर रॅशेस, डोकेदुखी, टायफॉइड, अल्सर यांसारखे विविध आजार नागरिकांना जडू शकतात.

अन्न व औषध प्रशासन सुस्तच
वर्धा जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासनाकडे पूर्वीच मनुष्यबळाची चणचण आहे. इतकेच नव्हे तर जिल्ह्यातील शासनाच्या या विभागाच्या बड्या अधिकाऱ्याकडे इतर जिल्ह्याचाही प्रभार असल्याने ते मोजकेच दिवस वर्धा जिल्ह्यासाठी देतात. दिवाळीच्या तोंडावर भेसळबाजीला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याची गरज असताना अन्न व औषध प्रशासन सुस्त असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

अल्प मनुष्यबळ
जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात अल्प मनुष्यबळ सध्या कार्यरत आहे. त्यामुळे कार्यरत अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. शासनानेही या विभागातील रिक्त पद तातडीने भरण्याची गरज आहे.

 

 

Web Title: Beware of adulterated khowa and paneer; Identify such adulteration at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न