स्वयंपाकघरातून तांब्याची भांडी नामशेष
By Admin | Updated: October 14, 2015 02:09 IST2015-10-14T02:09:23+5:302015-10-14T02:09:23+5:30
आगरगाव: पूर्वी घरोघरी जेवणात तसेच अन्न शिजविण्यासाठी तांब्याची भांडी मोठ्या संख्येने वापरात होती.

स्वयंपाकघरातून तांब्याची भांडी नामशेष
आरोग्यावर परिणाम : विद्युत वाहक असल्याने किमतीत वाढ
आगरगाव: पूर्वी घरोघरी जेवणात तसेच अन्न शिजविण्यासाठी तांब्याची भांडी मोठ्या संख्येने वापरात होती. त्याचा औषधी गुणधर्मही लोकांना ठाऊक होता. मात्र बदल्या जीवनशैलीचा परिणाम तांब्यांच्या भांड्यांवरही पडला आहे. परिणामी प्राचीन काळापासून वापरात असलेली ही भांडी आज अनेक घरांमधून कालबाह्य झाल्याचे दिसते.
या तांब्यांच्या भाड्याांची जागा आता स्टेनलेस स्टील व फायबरच्या भाड्यांनी घेतली आहे. आरोग्य सुदृढ रहावे यासाठी पूर्वीच्या काळी तांब्याची भांडी वापरली जात असत. मात्र कालौघात ही भांडी दुर्मिळ झाल्याचे चित्र आहे. नव्या पिढीकडून रेडिओ, टीव्ही, जुन्या लाकडी खुर्च्यासह अन्य जुन्या काळातील वस्तूंचा वापर होत नसल्याचे दिसते. यातच तांब्याची भांडीदेखील हद्दपार करून आता फायबर व स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांचा वापर सर्रास सुरू झाला आहे.
सध्याच्या काळात केवळ गरजेपुरताच तांब्याच्या भांड्यांचा वापर होताना दिसतो. धार्मिक कार्यात आजही आवर्जून तांब्याची भांडी वापरली जातात. तांबा या धातूंचा उपयोग अनेक ठिकाणी केला जातो. तांबा वाहक असल्यामुळे विद्युत पुरवठ्यासाठी या तारांचा उपयोग केला जातो. रबरची कोटींग असलेल्या तांब्याच्या तारांचा उपयोग वायर म्हणून घरातील वीज जोडणीसाठी केला जातो.
तांबे हा धातू बहुगुणी असून आरोग्यासाठी अतिशय उत्तम असल्याचा उल्लेख आयुर्वेदात आढळतो. तांब्याच्या भांड्यात रात्री पाणी भरून ते सकाळी उपाशीपोटी प्यायल्याने अनेक आजार नाहिसे होतात, असे तज्ज्ञ सांगतात. स्टीलच्या भांड्यांपेक्षा तांब्याच्या भांड्यांचा वापर अधिक होत असलेले स्वयंपाकघर आता दुर्मिळच झाल्याचे चित्र आहे. तांबे हे खाद्यपदार्थातील विषाणूंचा नायनाट करते, असे सांगतात. मात्र ग्रामीण भागासह शहरातूनही तांब्याची भांडे हद्दपार होत असल्याचे दिसून येते.(वार्ताहर)