बाबासाहेबांचा बुद्धधम्म अंधश्रद्धामुक्त अन् विवेकनिष्ठ

By Admin | Updated: April 17, 2016 02:03 IST2016-04-17T02:03:08+5:302016-04-17T02:03:08+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म स्वीकारताना या धर्मातील सर्व अंधश्रद्धा नाकारल्या, त्यांची शुद्धता करुन त्यांनी पुरोगामी, मानवीय बौद्ध धम्माचा स्वीकार केला.

Babasaheb's Buddhammhamam is blindfolded and discriminatory | बाबासाहेबांचा बुद्धधम्म अंधश्रद्धामुक्त अन् विवेकनिष्ठ

बाबासाहेबांचा बुद्धधम्म अंधश्रद्धामुक्त अन् विवेकनिष्ठ

श्याम मानव : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची व्याख्यानमाला
वर्धा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म स्वीकारताना या धर्मातील सर्व अंधश्रद्धा नाकारल्या, त्यांची शुद्धता करुन त्यांनी पुरोगामी, मानवीय बौद्ध धम्माचा स्वीकार केला. त्यांना धम्माला रुजविण्याकरिता पुरेसा वेळ मिळाला नाही. पण त्यांच्या विचारांचा ग्रंथांचा अभ्यास केल्यास विक्तुबाबा व तत्सम बाबांकडे जाणे, गंडेदोरे, बांधणे, ग्रहताऱ्यांवर विश्वास करणे त्यांच्या विचारांच्या टोकाचे विपरीत आहे, हे लक्षात येईल, असे विचार अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने येथील पोलीस ग्राउंडवर चार दिवसीय व्याख्यानमालेच्या अखेरच्या दिवशीचे विचारपुष्प गुंफतांना मानव बोलत होते. कार्यक्रमाला ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव, आयबीएन लोकमतचे सिनिअर प्रोड्युसर विनोद राऊत, भीम टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब शेळके, प्रसिद्ध गायक उत्कर्ष शिंदे, मुख्य आयोजक प्रमोद राऊत, अतुल दिवे, विशाल रामटेके, महेंद्र मुनेश्वर उपस्थित होते. मानव पुढे म्हणाले डॉ. आंबेडकरांनी तर्कशुद्ध पद्धतीने विविध धर्माची चिकित्सा केली. हिंदू धर्मातील अंधश्रद्धा, जातीभेद आणि अस्मृश्यतेची अमानवीय प्रथा त्यांना अमान्य होती. चिकित्सेअंतीच त्यांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. बुद्ध धम्मात अंधश्रद्धेला, बुवाबाजीला थारा नसणार, मानवता हेच सूत्र त्यांनी ध्यानात घेतले. आज आपण बाबासाहेबांचा धम्म विसरुन कुण्या बुवाबाबाच्या, मंत्रतंत्राच्या वा गंड्यादोऱ्यांच्या नादी लागत असू, तर आपण पुन्हा त्याच वाटेवर परत जात असल्याचे म्हणावे लागेल. सत्यनारायण नाकारला म्हणून परित्राण पाठ स्वीकारायचा काय? बाबासाहेबांचा विचार पुढे नेण्याकरिता पुरोगामित्व आणि सदसद्विवेकबुद्धी स्वीकारणे हीच आपली खरी गरज आहे, असेही ते निक्षून म्हणाले.
महाराव म्हणाले डॉ. आंबेडकरांचे अनुयायांचा समाज हा जीवंत समाज आहे. रात्री उशिरापर्यंत पोट बाजूला ठेवून आपण बाबासाहेबांचे विचार ऐकत आहात, प्रबोधनाला पुढे नेत आहात, ही फार मोठी गोष्ट आहे. बाबासाहेबांचे विचार विस्तारण्याकरिता आपण स्वत:ला झोकून काम केले पाहिजे. प्रतिगामी शक्तीचा मुक्त संचार वाढला आहे, नको ते मुद्दे काढून देशभक्त, देशद्रोही ठरविले जात आहेत. मुळ मुद्दे-प्रश्न बाजुला सारुन धर्माचे आणि भावनिक आवाहन करुन नागरिकांची फसवणूक केली जात आहे. हा प्रतिगामी विचार थोपवून लावण्याकरिात आपल्याला सज्ज व्हावे लागेल, असेही महाराव म्हणाले. यावेळी दादासाहेब शेळके यांनीही प्रभावीपणे विचार व्यक्त केले. प्रास्ताविक प्रमोद राऊत यांनी केले. संचालन व आभार प्रदर्शन अतुल दिवे यांनी केले. या व्याख्यानाला हजारोच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.(जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Babasaheb's Buddhammhamam is blindfolded and discriminatory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.