आशांना दिलेले आश्वासन अपूर्णच
By Admin | Updated: February 21, 2016 01:28 IST2016-02-21T01:28:07+5:302016-02-21T01:28:07+5:30
राज्य शासनाने आशा व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मागण्यांच्या पूर्ततेबाबत दिलेल्या आश्वासन वर्ष होऊनही अद्याप पूर्ण केलेले नाही.

आशांना दिलेले आश्वासन अपूर्णच
वर्षपूर्तीनंतरही पानसरेेंचे मारेकरी मोकाटच : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयटकचे धरणे
वर्धा : राज्य शासनाने आशा व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मागण्यांच्या पूर्ततेबाबत दिलेल्या आश्वासन वर्ष होऊनही अद्याप पूर्ण केलेले नाही. कॉमे्रड गोविंद पानसरे यांची हत्या होऊन वर्ष लोटले. त्यांचे मारेकरीही एक वर्ष पूर्ण होऊन मोकाटच आहेत. त्यामुळे आॅल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) आणि परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने तीव संताप व्यक्त करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
आरोग्य विभागात काम करणाऱ्या आशा, गट प्रवर्तक आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत केंद्र व राज्य शासनाला वारंवार निवेदने देण्यात आली. आंदोलन व मोर्चेही काढण्यात आले. अनेकवार झालेल्या चर्चेत त्यांच्या मागण्या त्वरीत निकाली काढण्यात येतील व येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्या मंजूर केल्या जातील असे आश्वासन शासनाद्वारे दिले होते. पण वर्ष लोटूनही यातील एकही मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही.
त्याचप्रकारे १६ फेब्रुवारी २०१५ रोजी कॉम्रेड गोविंद पानसरे यांना गोळ्या झाडण्यात आल्या. २० रोजी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेलाही शनिवारी एक वर्ष पूर्ण झाले. तरीही राज्य शासनाला पानसरेंच्या मारेकऱ्यांना अद्याप शोधता आलेले नाही. एवढेच नव्हे, तर त्यांच्या हत्येचा कुठलाही धागादोरा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तीन महिन्यात पानसरेंचे मारेकरी अटकेत असतील असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. या आश्वासनाचे स्मरण करून देण्यासाठी आयटक व परिवर्तनवादी संघटनांद्वारे शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. त्याचप्रमाणे आशा व अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठीही निवेदन दिले.
सदर आंदोलनात आयटकचे राज्यसचिव दिलीप उटाणे, जिल्हाध्यक्ष मनोहर पचारे, उपाध्यक्ष विजया पावडे, कोषाध्यक्ष वंदना कोळमकर, संघटक अस्लम पठाण, सहसचिव सुरेश गोसावी, जिल्हाकार्याध्यक्ष गुणवंत डकरे, ज्ञानेश्वरी डंभारे, मयना उईके, मंगला इंगोले, विमल कौरती, सुनंदा आखाडे आदी सदस्यांसह शोभा तिवारी, रेखा काचोळे, नलिनी चौधरी, माला भगत, शोभा सायंकार, यमुना नगराळे, बबिता चिमोटे, वंदना बाचले, अरूणा नागोसे, अरूणा नागोसे, ज्योती कुळकर्णी, माला कुत्तरमारे, सुजाता भगत, संध्या म्हैसकर, प्रतिभा वाघमारे आदींसह शेकडो आशा व अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले होते.(शहर प्रतिनिधी)
प्रलंबित मागण्या
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संबंधात चंदेशकुमारी, यांच्या अध्यक्षतेखाली ३१ महिला खासदारांच्या समितीच्या पार्लमेंट कमिटीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेंन्शन योजना लागू करा, आयसीडीएस मिशन मोड रद्द करा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा लागू करा, आशा व गटप्रवर्तकांना वेतन कायद्याप्रमाणे एकत्रित वेतन द्या.
यवतमाळ औद्योगिक न्यायालयाने आशा व गटप्रवर्तक यांच्या वेतनाबाबत दिलेला निर्णय त्वरीत लागू करण्यात यावा व शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना जिल्हा परिषदेत रिक्त पदावर समावून घ्यावा आदी मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत.