विधानसभा निवडणुकीत आघाडीचे अस्तित्व नवमतदारांच्या हाती
By Admin | Updated: May 22, 2014 01:20 IST2014-05-22T01:20:14+5:302014-05-22T01:20:14+5:30
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वालाच सुरूंग लागला आहे.

विधानसभा निवडणुकीत आघाडीचे अस्तित्व नवमतदारांच्या हाती
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वालाच सुरूंग लागला आहे. या निवडणुकीत देवळी, हिंगणघाट आणि वर्धा विधानसभा क्षेत्रात काँग्रेसची मते कमी झाली असली तरी धामणगाव व मोर्शी विधानसभा क्षेत्रात मात्र काँग्रेसच्या मतांत फारशी घसरण झाली नाही, तर आर्वी क्षेत्रात मात्र काँग्रेसच्या मतात वाढ झाली आहे. असे असले तरी नवमतदारांनी मात्र काँग्रेसला साफ नाकारल्याचे धक्कादायक वास्तव आहे. ही बाब भविष्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धोकादायक ठरण्याची शक्यता बळावली असल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीच्या खेम्यात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. २00९ मध्ये सहाही विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला ३ लाख ५२ हजार ५५२ मते मिळाली होती. या निवडणुकीत ही मते ३0 हजार ८१७ नी कमी झालेली आहे. भाजपला ५ लाख ३७ हजार ५१८ मते मिळाली. २00९ मध्ये २ लाख ५६ हजार ६२३ मते मिळाली होती. यात मतांमध्ये तब्बल २ लाख ८0 हजार ८९५ मतांची भर पडली आहे. या वाढलेल्या मतांत काही जुनीच असली तरी बहुतेक सर्वच नव मतदारांची मतेही भाजपकडेच वळली असल्याचे स्पष्ट होते. हे नवमतदार आगामी विधानसभा निवडणुकीत कोणाच्या बाजुने वळते. यावरच विद्यमान आमदारांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. यातून भाजप-सेनाही सुटण्याची शक्यता कमी आहे. धामणगाव विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला ६४ हजार ४३४ मते मिळाली. २00९ मध्ये ही आकडेवारी ६४ हजार ८६८ इतकी होती. यामध्ये केवळ ४३४ मतांचाच फरक आहे. भाजपाला ८९ हजार ८५५ मते मिळाली. २00९ मध्ये भाजपाला केवळ ४९ हजार ४८0 मते मिळाली होती. यात ४0 हजार ३७५ ने वाढ झाली आहे. मोर्शी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला ४९ हजार १३७ मते मिळाली. २00९ मध्ये ही आकडेवारी ४९ हजार १११ इतकी होती. यात केवळ २६ मतेच कमी मिळाली, तर भाजपाला तब्बल १ लाख ९८२ मते मिळाली. २00९ मध्ये भाजपकडे ५२ हजार ५३८ मतेच होती. यात तब्बल ४८ हजार ४४४ मतांची भक्कम आघाडी मिळाली आहे. आर्वी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला ६२ हजार २८२ मते मिळाली होती. २00९ मध्ये काँग्रेसला ५६ हजार १२0 मतेच मिळाली. यात काँग्रेसची ६ हजार १६३ मते वाढली आहे हे विशेष. काँग्रेसच्या जुन्या मतात वाढ झालेले आर्वी हे एकमेव विधानसभा क्षेत्र आहे. भाजपाला ७७ हजार ६२३ मते मिळाली. २00९ मध्ये भाजपला ४३ हजार ४३७ मते मिळाली होती. यात ३४ हजार १८६ मतांची वाढ झालेली आहे. देवळी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला ५१ हजार २९६ मते मिळाली. २00९ मध्ये काँग्रेसला ५९ हजार ८४५ मते मिळाली होती. यात ८ हजार ५४९ मतांची घसरण झाली आहे. भाजपला ८१ हजार ८२२ मते मिळाली. २00९ मध्ये भाजपला केवळ ३६ हजार ७७९ मतेच मिळाली होती. यात ४५ हजार ४३ मतांची वाढ झालेली आहे. हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला ४५ हजार १९४ मते मिळाली. २00९ मध्ये मतांची आकडेवारी ६0 हजार ११0 इतकी होती. यात १४ हजार ९१६ मतांनी काँग्रेस माघारली. भाजपला १ लाख १ हजार २0५ मते मिळाली. २00९ मध्ये भाजपला केवळ ४३ हजार ४३७ मतेच मिळाली होती. यामध्ये तब्बल ५८ हजार १0२ मतांची आघाडी मिळाली आहे. वर्धा विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला ४९ हजार १२ मते मिळाली होती, तर २00९ मध्ये ही आकडेवारी ६२ हजार ४७७ च्या घरात होती. यात १३ हजार ४६५ मतांनी पिछाडीवर आहे, भाजपला ८५ हजार २९१ मते मिळाली. २00९ मध्ये भाजपाला सर्वात कमी ३१ हजार २८६ मते मिळाली होती. यात ५४ हजार ५ मतांची नेत्रदीपक आघाडी मिळाली आहे. भाजप-सेना आमदारांपुडे ही मतांची आघाडी टिकविण्याचे तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांपुढे ही मते वळविण्याचे कसब दाखवावे लागणार आहे.