आर्वीत सार्वजनिक उद्यानाची वाणवा
By Admin | Updated: May 31, 2014 23:41 IST2014-05-31T23:41:25+5:302014-05-31T23:41:25+5:30
ज्येष्ठांना सायंकाळी बसण्याकरिता तर चिमुकल्यांना बागडण्याकरिता तर शहराचे सौंदर्य वाढविण्याकरिता शहरात मोठे उद्यान असावे असे अनेकांचे म्हणणे आहे. यानुसार आर्वीत उद्यानाची निर्मितीही झाली

आर्वीत सार्वजनिक उद्यानाची वाणवा
सुरेंद्र डाफ - आर्वी
ज्येष्ठांना सायंकाळी बसण्याकरिता तर चिमुकल्यांना बागडण्याकरिता तर शहराचे सौंदर्य वाढविण्याकरिता शहरात मोठे उद्यान असावे असे अनेकांचे म्हणणे आहे. यानुसार आर्वीत उद्यानाची निर्मितीही झाली मात्र त्यांच्या देखरेखीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे या उद्यानात आता कचर्याचे अंबार लागले आहेत. याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत असल्याची ओरड होत आहे. पालिकेच्या अधिकार क्षेत्रात येत असलेल्या उद्यानाची दुरूस्ती करण्याची मागणी आर्वी येथील नारिकांकडून करण्यात येत आाहे.
४५ हजारांच्यावर लोकसंख्या असलेले हे शहर आहे. शिवाय आर्वी, आष्टी, कारंजा या तिनही तालुक्याच्या उपविभागाचे हे शहर आहे. असे असतानाही या शहरात वृद्ध व बालकांना हक्काचे हवे असणारे एकही सार्वजनिक उद्यान नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत सायंकाळी खेळण्याकरिता आर्वीत वयोवृद्धासाठी अनामिका सार्वजनिक उद्यान गत तीन-चार वर्षांपासून खंडर झाले आहे. हे अद्यान आता अवैध व्यवसायाचे केंद्र बनले आहे.
आर्वी शहर हे उपविभागाचे शहर म्हणून तालुक्यात परिचित आहे. आर्वी न.प.च्या अखत्यारीतील एकमेव अनामिका हे उद्यान आहे. हे लहान बालक व वृद्धांचे सायंकाळी बसण्याचे हक्काचे ठिकाण म्हणून ओळखल्या जात होते. येथे असणार्या खेळाच्या साहित्यावर लहान मुल बागडायचे. वृद्धांनाही सायंकाळी बसण्याकरिता हक्काचे ठिकाणी म्हणून निवांत बसण्याची व्यवस्था व्हायची; परंतु गत चार वर्षात आर्वीच्या एकमेव असणार्या सार्वजनिक अनामिका उद्यानाला सध्या उकिरड्याचे स्वरूप आले आहे.
सध्या नगर परिषदेत भाजपाची बहुमतात सत्ता आहे. गत तीन वर्षांपासून अनामिका उद्यानाच्या सौंदर्यीकरणाचा प्रश्न सुटला नाही. यामुळे आर्वीतील वृद्ध, बालकांना अजूनही बागडण्याकरिता व सायंकाळच्यावेळी बसण्याकरिता हक्काच्या जागेपासून वंचित राहावे लागत आहे.
मध्यवस्तीत व तहसील कार्यालयासमोर असणार्या या अनामिका उद्यानाची अवस्था सध्या दयनीय झाली आहे. या जागेवर सध्या ठिकठिकाणी उकिरडे व कचर्याचे ढिग साचले आहेत. आर्वी शहराच्या मध्यवस्तीत असणारे व सध्या अडगळीत पडलेल्या अनामिका उद्यानाला पूर्वीचे वैभव पुन्हा कधी येणार का, असा सवाल सध्या आर्वीकर करीत आहेत. आर्वी पालिकेच्या सभेत या अनामिका उद्यानाच्या गत वैभवावर सत्ताधारी व विरोधी न. प. सदस्य पुढाकर घेत त्याच्या दुरुस्तीकरिता प्रयत्न करणार काय, असा सवाल आर्वीकरांचा आहे.