गवंडी व उमरी गावात कृत्रिम पाणीटंचाई
By Admin | Updated: June 16, 2014 23:40 IST2014-06-16T23:40:59+5:302014-06-16T23:40:59+5:30
तालुक्यातील गवंडी आणि उमरी गावाला स्वतंत्र राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाली आहे. योजनेचे कामही सुरू झाले आहे. परंतु काम अत्यंत संथ गतीने सुरू असून, अभियंत्याच्या दुर्लक्षितपणामुळे मे जून महिन्यात

गवंडी व उमरी गावात कृत्रिम पाणीटंचाई
कांरजा (घा.) : .तालुक्यातील गवंडी आणि उमरी गावाला स्वतंत्र राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाली आहे. योजनेचे कामही सुरू झाले आहे. परंतु काम अत्यंत संथ गतीने सुरू असून, अभियंत्याच्या दुर्लक्षितपणामुळे मे जून महिन्यात गवंडी व उमरीच्या जनतेला कृत्रिम पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत असल्याची ओरड येथील नागरिक करीत आहे.
सभोवतालच्या विहिरी आटल्यामुळे जनतेला दोन दोन किमी. अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. नियमित विद्युत पुरवठा सुरू नसल्यामुळे या कृत्रिम पाणी टंचार्ईला वीज वितरण कंपनीसुद्धा तेवढी जबाबदार असल्याची तक्रार माजी सरपंच नागोराव देवासे यांनी केली आहे.
काही वर्र्षापूर्वी उमरी आणि गवंडी या दोन्ही गावांना नारा अधिक २२ या योजनेअंतर्गत पाणीपुरवठा होत होता. परंतु तांत्रिक दोषामुळे या दोन्ही गावाला नारा अधिक २२ योजनेंतर्गत पुरेसे पाणी पोहचू शकले नाही. त्रस्त नागरिकांनी या दोन्ही गावाला स्वतंत्र पाणीपुरवठा योजना द्यावी अशी मागणी केली. पण ही दोन्ही गावे नारा २२ योजनेला जोडली असल्यामुळे स्वतंत्र योजना देता येत नाही असे कारण पाणी पुरवठा विभागाने पुढे केले. त्यामुळे जनतेचे हाल सुरूच राहीले.
त्रस्त जनतेच्या सतत पाठपुराव्याने राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत गवंडी साठी २०१२-१३ तर उमरी करिता २०११-१२ मध्ये स्वतंत्र योजना मंजूर करण्यात आल्यास योजनेचे काम सुरू झाले. परंतु संबंधित अभियंत्याच्या चालढकल धोरणामुळे बांधकाम अत्यंत संथ गतीने सुरू असून अद्यापही अपूर्ण आहे. योजनेला पाहिजे असलेला विद्युत पुरवठाही अद्याप देण्यात आला नाही. परिणामी या दोन्ही गावात भीषण स्वरूपाची कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
उमरी ग्रामपंचायतकरिता राष्ट्रीय पेयजल योजना धावसा येथील तलावावरून घेण्यात आली असून गवंडीची योजना मात्र जुन्याच विहिरीवरून सुरू करण्यात आली आहे. जुनी विहीर खोल करून, जुजबी बांधकाम करून नवीन पार्ईप लार्ईन व मोटर पंप मंजूर करण्यात आला. पण अद्याप नवीन ट्रान्सफार्मर डिस्ट्रीब्युशन बॉक्स न लावल्यामुळे योजनेला वीज पुरवठा सुरळीत सुरू झालेला नाही. येत्या आठ दिवसात पाणी पुरवठा आणि वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास दोन्ही गावच्या नागरिकांना सोबत घेवून, आंदोलन करण्याचा इशारा गवंडीचे माजी सरपंच नागोराव देवासे यांनी दिला आहे.(तालुका प्रतिनिधी)