रस्ता की कृत्रिम तलाव?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 23:16 IST2018-06-25T23:15:53+5:302018-06-25T23:16:14+5:30

येथून सेवाग्राम रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या जुन्या मार्गाची दैनावस्था झाली आहे. या मार्गाने ये-जा करताना रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता असाच प्रश्न वाहनचालकांना पडतो.

Artificial lake of the road? | रस्ता की कृत्रिम तलाव?

रस्ता की कृत्रिम तलाव?

ठळक मुद्देसेवाग्राम रेल्वे स्थानक मार्गावरील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येथून सेवाग्राम रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या जुन्या मार्गाची दैनावस्था झाली आहे. या मार्गाने ये-जा करताना रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता असाच प्रश्न वाहनचालकांना पडतो. इतकेच नव्हे तर रस्त्याच्या कडेला नाली नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात सदर रस्त्याला तळ्याचे स्वरूप येते. परिणामी, साधे पायी ये-जा करणेही कठीण होते. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देत रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
वर्धा शहरातील नागरिकांना सेवाग्राम रेल्वे स्थानक गाठण्यासाठी इतवारा पोलीस चौकी होत जाणारा जुना मार्ग सोयीचा तसेच कमी अंतराचाच आहे. परिणामी, अनेक आॅटो चालक व दुचाकी चालक याच मार्गाने सेवाग्राम रेल्वे स्थानक गाठतात. परंतु, सध्या या मार्गावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत. शिवाय रस्त्यावरील डांबर पूर्णत: उखडले आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाºयांना खड्डे चुकविण्यासाठी तारेवरची कसरतच करावी लागत आहे. वर्धा शहरातील इतवारा चौक येथून पोलीस चौकी पर्यंतचा रस्ता काही प्रमाणात बरा आहे; पण स्मशानभूमिच्या विसाव्या नंतर वाहनचालकांना तारेवरची कसरतच खड्डे चुकविण्यासाठी करावी लागते. या मार्गावर खड्डे चुकविताना वाहन अनियंत्रित होऊन दररोज छोटे-मोठे अपघात होतात. मात्र, अनेक प्रकरणे पोलीस कचेरीपर्यंत पोहोचत नाहीत. बहूदा रस्त्याच्या दैनावस्थेमुळे वाहन पंक्चरही होते. परिणामी, वाहनचालकांना अर्थिक फटकाही सहन करावा लागत आहे. जून महिन्याच्या दुसºया आठवड्यात झालेल्या पावसाचे पाणी अजुनही नाली अभावी वाहून गेले नाही. त्यामुळे या रस्त्याला सध्या तळ्याचे स्वरूप आले आहे. संभाव्य धोका लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देत रस्त्याची दुरूस्ती व पक्की नाली तयार करण्याची मागणी आहे.

रस्त्याच्या कडेला नाली तयार करणे गरजेचे
सेवाग्राम रेल्वे स्थानक मार्गावर पावसाळ्याच्या दिवसात नाली अभावी पावसाचे पाणी साचते. परिणामी, या मार्गाला पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तळ्याचे स्वरूप येते. पावसाचे पाणी रस्त्यावर साचू नये म्हणून रस्त्याच्या दुतर्फा पक्की नाली तयार करणे गरजेचे आहे, तशी मागणीही वाहनचालकांसह नागरिकांची आहे.
मोठ्या अपघाताची भीती
सेवाग्राम रेल्वे स्थानक मार्गावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले असून पावसाळ्यात रस्त्याला तळ्याचे स्वरूप येते. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने हा प्रकार मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे.

Web Title: Artificial lake of the road?