सशस्त्र हल्ला; ११ जणांना अटक
By Admin | Updated: January 14, 2016 02:44 IST2016-01-14T02:44:38+5:302016-01-14T02:44:38+5:30
कुणाकडून नोकरी लावून देण्याच्या निमित्ताने तर कुणाकडून अन्य कारणासाठी रक्कम घेणाऱ्या इसमाच्या घरावर मंगळवारी सशस्त्र हल्ला करण्यात आला.

सशस्त्र हल्ला; ११ जणांना अटक
राऊतवाडी येथील घटना : नोकरीसाठी घेतलेल्या पैशाचा होता वाद
वर्धा : कुणाकडून नोकरी लावून देण्याच्या निमित्ताने तर कुणाकडून अन्य कारणासाठी रक्कम घेणाऱ्या इसमाच्या घरावर मंगळवारी सशस्त्र हल्ला करण्यात आला. या प्रकरणात शहर पोलिसांनी तब्बल ११ जणांना अटक करण्यात आली. यातील दोन जण अद्यापही फरार आहेत. ही कारवाई मंगळवारी रात्री व बुधवारी करण्यात आली.
शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरालगतच्या आलोडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या राऊतवाडी परिसरातील जुगलकिशोर चव्हाण यांनी अनेक लोकांकडून नोकरी व अन्य कारणांतून मोठी रक्कम गोळा केली होती; पण कुणालाही नोकरी लावून दिली नाही. या रकमेच्या वसुलीकरिता शहरातील तिघांच्या मदतीने भंडारा व नागपूर जिल्ह्यातील तब्बल दहा जणांनी चव्हाण यांच्या घरावर सशस्त्र हल्ला चढविला. त्यांच्या परिवाराला धाकदपट करून रकमेची मागणी करण्यात आली. ही घटना मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. याबाबत चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. याप्रसंगी शस्त्रासह घरासमोर दंगा केला जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यावरून पोलिसांनी शेख जावेद उर्फ जॉन शेख रफीक रा. महादेवपूरा वर्धा, अमित जगराजसिंग परियाल रा. वर्धमाननगर नागपूर, मनीष किशोर धनविजय रा. अंबानगर नागपूर, विलास हरिभाऊ येळणे, दिलीप रामकृष्ण येळणे, मंगेश रामकृष्ण तळवले, विजय धनराज कुमरे व हिरालाल ज्ञानेश्वर पारेकर सर्व रा. पिंपळगाव निपाणी, ता. पवनी, जि. भंडारा तसेच व्यंकटेश तुलीचंद राऊत रा. पारडी, ता.जि. नागपूर, मनोहर विजय रणपिसे रा. भंडारा जि. नागपूर आणि कविता प्रमोद पाल रा. भंडारा जि. नागपूर या अकरा जणांना ताब्यात घेतले. यातील राकेश पांडे रा. रामनगर व अतुल मुंगले रा. गजानननगर वर्धा हे दोघे फरार होण्यात यशस्वी झाले. शहर पोलिसांनी भादंविच्या कलम १४३, १४७, १४९, ४४९ अन्वये गुन्हा दाखल करीत बुधवारी सर्वांना न्यायालयात हजर केले. यात त्यांना १५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
नोकरी लावून देण्याच्या कारणातून पैसे घेऊन फसवणूक करणाऱ्यांमध्ये सध्या वाढ झाली आहे. राऊतवाडी येथील जुगलकिशोर चव्हाण यांनीही सुमारे दहा लोकांकडून नोकरी लावून देण्याच्या कारणातून पैसे घेतले होते. कुणाकडून ५० हजार तर कुणाकडे ७० हजार रुपयांपर्यंत रक्कम घेतली; पण कुणालाही नोकरी लावून दिली नाही. शिवाय रक्कमही परत केली नाही. याबाबतचा वाद गत अनेक दिवसांपासून सुरू होता, अशी माहिती शहर पोलिसांनी दिली. यावरूनच वर्धेतील तिघांच्या मदतीने दहा जणांनी चव्हाण यांच्या घरावर सशस्त्र हल्ला चढविला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांत मात्र खळबळ माजली.(कार्यालय प्रतिनिधी)
फसवणुकीच्या प्रकारामध्ये होतेय वाढ
पोलीस यंत्रणेकडून नागरिकांमध्ये वारंवार जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जात असताना फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. कुणी एटीएम कार्डचा पिन नंबर विचारून तर कुणी बँकेतून नागरिकांची फसवणूक करीत असल्याच्या घटना उघड होत आहेत. असे असताना नोकरीच्या नावावर फसवणूक करणाऱ्यांमध्येही वाढ होत असल्याचेच दिसून येत आहे. राऊतवाडी येथील चव्हाण यांनीही नोकरी लावून देण्याचे आमिष देत नागपूर जिल्ह्यातील भंडारा तालुक्यातील अनेक नागरिकांकडून पैसे घेतल्याचे समोर आले आहे. यात संबंधितांना नोकरीही लावून दिली नाही आणि पैसेही परत केले नाही. याच पैशाच्या वादातून मंगळवारी सशस्त्र हल्ला करण्यात आला. वेळीच शहर पोलिसांत तक्रार देण्यात आल्याने अनुचित प्रकार टळला. हा हल्ला शहरातील तीन गुंडांच्या मदतीने करण्यात आल्याचेही समोर आले. या प्रकारामुळे राऊतवाडी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मंगळवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास चव्हाण यांच्या घरासमोर दाखल झालेल्या आरोपींनी बराच वेळ परिसरात गोंधळ घातला. त्यांच्या हातात शस्त्र असल्याने परिसरात दहशत निर्माण झाली होती. अखेर पोलिसांनी घटनास्थळ गाठताच प्रकरण निवळले.
अफवांना उधाण
मंगळवारी सायंकाळी पोलिसांचा ताफा आलोडी परिसरातील राऊतवाडीकडे निघाल्याचे पाहून सर्वत्र अफवांना उधाण आले होते. कुणी खंडणीसाठी गुंडांनी धमकविले तर कुणी कुणाला तरी मारण्याकरिता गुंड आल्याने पोलीस ताफा आला, अशा अफवा पसरल्या होत्या. या अफवांमुळे नागरिकांमधील कुतूहल व भीतीही वाढत होती. अखेर पोलिसांच्या कारवाईनंतर प्रकरण स्पष्ट झाले.