सर्वच शेतकऱ्यांना मिळणार जीवनदायी योजनेचा लाभ
By Admin | Updated: June 11, 2016 02:33 IST2016-06-11T02:33:54+5:302016-06-11T02:33:54+5:30
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यातील सर्वच शेतकरी कुटूंबांना याचा लाभ मिळणार आहे.

सर्वच शेतकऱ्यांना मिळणार जीवनदायी योजनेचा लाभ
शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबाना लाभ
वर्धा : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यातील सर्वच शेतकरी कुटूंबांना याचा लाभ मिळणार आहे. वर्धा जिल्ह्याचाही या योजनेत समावेश असून शुभ्र शिधापत्रिका धारक शेतकरी कुटूंबांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या शिधापत्रिका तसेच सातबाराच्या उताऱ्यावर योजनेचा लाभ घेता येईल.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत औरंगाबाद, अमरावती व नागपूर विभागातील वर्धा या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटूंबांना लाभ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेची अमलबजावणी सुरू झाली असून शेतकरी कुटूंबांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटूंबांना त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या शिधापत्रिका तसेच सातबाराच्या उताऱ्यावर योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच ज्या शेतकरी कुटूंबांकडे कोणतीही शिधापत्रिका नाही अशा लाभार्थ्यांस फक्त त्यांच्याकडे असलेल्या सातबाराच्या उताऱ्यावर योजनेचा लाभ घेता येईल. शेतकरी कुटूंबांतील कोणत्याही लाभार्थ्यांस विमा कंपनीने लाभ नाकारू नये अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहे. शेतकरी कुटूंबांतील सदस्याचे नाव शिधापत्रिका किंवा सातबाराच्या उताऱ्यात समाविष्ट नसल्यास सदस्य हा त्या कुटूंबांतील असल्याचे संबंधित महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. लाभार्थी कुटूंबाचा व्यवसाय हा फक्त शेती एवढाच असणे आवश्यक राहील. शासकीय अथवा निमशासकीय सेवेत असलेल्या शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकऱ्याला योजनेचा लाभ नाही.(शहर प्रतिनिधी)