शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून केली शेती

By Admin | Updated: February 8, 2016 02:15 IST2016-02-08T02:15:38+5:302016-02-08T02:15:38+5:30

येथील सरकारी आबादीच्या ८१ आर जमिनीवर येथील एका शेतकऱ्याने अतिक्रमण केले.

Agriculture by encroaching on government land | शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून केली शेती

शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून केली शेती

शेतकऱ्यांची वहिवाट अडली : दीड वर्षांपासून प्रकरण धूळ खात
कारंजा (घाडगे): येथील सरकारी आबादीच्या ८१ आर जमिनीवर येथील एका शेतकऱ्याने अतिक्रमण केले. त्याने या जमिनीवर शेती करणे सुरू केल्याने येथून जाणारा रस्ता बंद झाला. यामुळे एकूण चार शेतकऱ्यांची त्यांच्या शेतात जाणारी वहिवाट बंद झाली आहे.
याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून अतिक्रमण काढण्याच्या सूचना खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. असे असताना येथील नायब तहसीलदाराकडून यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या अतिक्रमणाला या अधिकाऱ्याचे पाठबळ असल्याची ओरड होत आहे. त्यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली असून या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणीही अधिकाऱ्यांनी केली आहे.
शेतात जाण्याचा रस्ता बंद झाल्याने अडचणीत आलेल्या चार शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे पत्र दिले. त्याच्या स्मराणाकरिता दोन वेळा पत्रव्यवहार केला. असे असताना संबंधीत नायब तहसीलदाराकडून काहीच कारवाई करण्यात आली नाही. यामुळे या अतिक्रमणालाा या अधिकाऱ्याचे पाठबळ असल्याची ओरड गावात होत आहे. मंडळ अधिकाऱ्याने चौकशी करून शासकीय जमिनीवर जेसीबीद्वारे खोदकाम करून ती ताब्यात घेत त्यावर पेरणी केल्याचा अहवालही तहसीलदारांना दिला आहे. तसे माहिती अधिकारातही पुढे आले आहे. त्या जागेवर संत्रा झाडे सुध्दा लावलेली, असल्याचा पुरावा आहे.
या सर्व प्रकारामुळे तक्रारकर्ते शेतकरी मारोती करमधार, भाऊराव बेलखेडे, गणपत सरोदे व किशोर मोकदम रा. कारंजा या चार शेतकऱ्यांचा पुढील शेतात जाणारा वहीवाटीचा रस्ता बंद झाला आहे. याकडे लक्ष देत कारवाई करण्याची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)

गाव नकाशानुसारही जागा शासकीय
कारंजा गाव नकाशा नमुनानुसार सर्व्हे क्रमांक १०२९, १०३०, १०३१ व १०३२ च्या मध्ये एल चिन्हाचे दर्शविलेली सरकारी आबादीची ८१ आर एवढी जागा आहे. भूमिअभिलेख वेळपत्रकामध्ये जुन्या प्रस्थापनानुसार सर्वे नं. ४८४/३ क, ४८४/३ ख आणि ४८४/१ग ही जागा ०.८१ हे. आर असून सध्या एल ने दर्शविलेली सरकारी आबादीची जागा म्हणून नोंद आहे.
निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने
याच रस्त्याच्या हक्काबाबत सन २००० मध्ये या चार शेतकऱ्यांनी शेतात जाण्यासाठी रस्ता मोकळा करून द्यावा म्हणून कारंजा तहसील कार्यालयात प्रकरण दाखल केले होते. तेव्हा या शेतकऱ्यांचे बाजूला निकाल लागला होता. असे असतानाही त्यावर अद्याप कारवाई झाली नाही.

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेलाही बगल
रस्ता मोकळा करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रावरून नायब तहसीलदार काचोरे व तहसीलदार जोशी यांना अतिक्रमण त्वरीत हटविण्याबद्दल व रस्ता मोकळा करून देण्याबद्दल सुचविले. याला दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही कारवाई झाली नाही.

सदर प्रकरण नायब तहसीलदार गणेश बर्वे यांच्याकडे आहे. मी प्रभारी तहसीलदार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सुध्दा सरकारी जमिनीवरील अतिक्रमण कायदेशीररित्या त्वरीत हटवून शेतकऱ्यांना शेतवाट मोकळी करून द्यावी असे सुचविले आहे. त्यानुसार भूमि अभिलेख अधिकारी संबंधीत अर्जदार शेतकरी व गैरअर्जदार बोलावून त्वरीत कारवाई करतो असे आश्वासन दिले आहे.
- मिलिंद जोशी, तहसीलदार, कारंजा (घा.)

Web Title: Agriculture by encroaching on government land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.