संगणक चालकांच्या कामबंद आंदोलनाने ग्रामस्थांत संताप
By Admin | Updated: October 30, 2014 22:56 IST2014-10-30T22:56:32+5:302014-10-30T22:56:32+5:30
हिंगणघाट तालुक्यातील संगणक परिचालकांना मानधन न मिळाल्याने त्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले होते़ यामुळे ग्रामपंचायत अंतर्गत मिळणारा मृत्यूचा दाखला, जन्म दाखला, रहिवासी दाखला,

संगणक चालकांच्या कामबंद आंदोलनाने ग्रामस्थांत संताप
पोहणा : हिंगणघाट तालुक्यातील संगणक परिचालकांना मानधन न मिळाल्याने त्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले होते़ यामुळे ग्रामपंचायत अंतर्गत मिळणारा मृत्यूचा दाखला, जन्म दाखला, रहिवासी दाखला, ना हरकत प्रमाणपत्र आदी अन्य कागदपत्रे मिळत नसल्याने ग्रामस्थांत असंतोष पसरला आहे़ शिवाय अनेक कामेही खोळंबली आहेत़
ग्रामपंचायतसह विविध शासकीय कार्यालयात मानधन तत्वावर तालुक्यात ६५ संगणक परिचालक काम करीत आहेत. या संगणक चालकांना गत चार महिन्यांपासून मानधन मिळाले नाही. मानधनाबाबत त्यांनी निवेदने दिलीत; पण मानधन देण्यात आले नाही़ यामुळे संतापलेल्या संगणक परिचालकांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते़ या आंदोलनामुळे गावातील नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागला़ आंदोलन संपुष्टात आले असले तरी ग्रामस्थांच्या समस्या मात्र अद्याप निकाली निघालेल्या नाहीत़
केंद्र शासनाच्या विविध योजनांत पंचायत समितीमार्फत विविध प्रकल्प राबवून त्यातच संगणक परिचालकाची नियुक्ती करण्यात आली़ हे संगणक परिचालक ग्रामपंचायत, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेत कार्यरत आहे. ग्रा़पं़ स्तरावरील परिचालकांना ८ हजारांऐवजी ३५०० ते ४१०० रुपयांवर बोळवण केली जात आहे. त्यातही त्यांना चार महिन्यांपासून मानधन दिले नाही़ यामुळे उदरनिर्वाह संकटात आला आहे़ याकडे लक्ष देणे गरजेचे आहे़(वार्ताहर)