अखेर जिल्हा बँकेला रिझर्व्ह बँकेचा परवाना
By Admin | Updated: May 3, 2016 02:32 IST2016-05-03T02:32:05+5:302016-05-03T02:32:05+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे मागील चार वर्षांपासून ठप्प पडलेले आर्थिक व्यवहार सुरू होण्याचे सर्व मार्ग मोकळे

अखेर जिल्हा बँकेला रिझर्व्ह बँकेचा परवाना
लवकरच अधिकृत घोषणा : शेतकरी व ठेवीदारांच्या चेहऱ्यावरील आनंद परतणार
वर्धा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे मागील चार वर्षांपासून ठप्प पडलेले आर्थिक व्यवहार सुरू होण्याचे सर्व मार्ग मोकळे झाले आहेत. मागील चार वर्षांत नैसर्गिक संकट आणि जिल्हा बॅँक बंद यामुळे शेतकऱ्यांची स्थिती आर्थिक कणा मोडल्यागत झाली होती. सोमवारी भारतीय रिझर्व्ह बॅँकेने जिल्हा बॅँकेला परवाना दिल्याची विश्वसनीय माहिती आहे. बोटावर मोजण्या इतक्या दिवसांतच बँकेचे व्यवहार सुरळीत होणार असल्याची माहिती आहे. याबाबत जिल्हाधिकारी अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती सूत्राने दिली. यामुळे शेतकऱ्यांसह ठेवीदारांच्या चेहऱ्यावर आनंद फुलणार आहे.
जिल्ह्यात शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेली जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांकडे व काही कर्जदारांकडे थकलेल्या कर्जापोटी आर्थिक अडचणीत आली होती. यामुळे रिझर्व्ह बँकेने सन २०१२ मध्ये बँकेचे आर्थिक व्यवहार गोठविले. कोणत्याही ठेवी स्वीकारू नका, असे आदेशच रिझर्व्ह बँकेने बँक व्यवस्थापनाला दिले. यानंतर काही महिन्यातच म्हणजे डिसेंबर २०१२ पासून बँकेचे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले. परिणामी, शेतकऱ्यांना कर्ज मिळणे बंद झाले. यामुळे बँकेची वसुलीही रखडली. वसुली होऊ न शकल्यामुळे जिल्हा बँकेची रिझर्व्ह बँकेकडे असेलली पत संपुष्टात आली. अखेर मे २०१४ मध्ये रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेचा परवानाच रद्द केला. यामुळे शेतकरी आणि ठेवीदार आर्थिक अडचणीत आले होते. या बँकेत जिल्ह्यात सर्वाधिक रक्कम शेतकऱ्यांची असून त्यांना त्यांच्या ठेवी मिळणे बंद झाले. शिवाय बँकेचे व्यवहारही धोक्यात आले होते. बँकेच्या व्यवहारावर आलेल्या प्रतिबंधामुळे सुमारे ४५० कोटींचे व्यवहार अडचणीत आले. खातेदारांच्या सुमारे ३५० कोटींच्या ठेवी बँकेकडे अडून पडल्या. बँकेची पत सिद्ध करण्याकरिता १०२ कोटींची गरज होती. बँक परत सुरू व्हावी, यासाठी शेतकरी हित जोपासणाऱ्या संघटनांसह विविध राजकीय पक्ष सरसावले. शासनावर दबाव आणण्याकरिता अनेक आंदोलने झालीत. आघाडी सरकारने बँकेचा परवाना परत मिळवून देण्याची घोषणाही केली होती; पण काही दिवसांतच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे घोर निराशा झाली. राज्यातील सरकार बदलले. नव्या सरकारनेही बँक सुरू होण्यासाठी हालचाली सुरू केल्या. केंद्र व राज्य सरकारने पुढाकार घेतला. नाबार्डकडूनही आर्थिक सहाय्य घेण्यात आले. यामुळे बँकेची पत परत आली. याच कारणाने भारतीय रिझर्व्ह बँकेने आज वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुन्हा सुरू करण्याचा परवाना दिल्याची माहिती माहितगार सूत्राने दिली. यानंतर ही बिकट स्थिती उद्भवू नये, यासाठी बँक सुरू करण्यापूर्वी जिल्हाप्रशासन काही मार्गदर्शक सूचना देणार असल्याची माहिती आहे. या संदर्भात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काही दिवसांतच बँक सुरू होणार असल्याचे सांगितले.(जिल्हा प्रतिनिधी)
बँकेच्या ठेवीदारांना दिलासा
४जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा परवाना रद्द केल्याने ४५० कोटींचे व्यवहार ठप्प झाले होते. ठेवीदारांमध्ये रकमा बुडण्याची भीती निर्माण झाली होती. शासनाने मदत करणे हा एकमेव पर्याय शिल्लक होता. यामुळे ३१ मार्च २०१३ पर्यंत बहुतांश ठेवीदारांनी आपल्या ठेवी परत घेतल्या. असे असले तरी अनेक शेतकऱ्यांच्या मोठ्या रकमा थकल्या आहेत. काही ठेवीदारांची १२ लाख रुपयांपर्यंतची रक्कम सहकारी बँकेत अडकली आहे. आता रिझर्व्ह बँकेने बँकींग परवाना बहाल केल्याने ठेवीदार भीतीमुक्त होणार आहे.
बँकेत अडल्या आहेत ३५० कोटींच्या ठेवी
४जिल्हा मध्यवर्ती बँकेत शेतकरी व खातेदारांच्या सुमारे ३५० कोटींच्या ठेवी अडलेल्या आहे. या परवान्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेला परवाना मिळाल्याची माहिती कानावर आली आहे. असे झाल्यास लवकरच बँक सुरू होईल. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
- सुरेश देशमुख, सहकार नेते तथा माजी आमदार, वर्धा