पतीच्या आत्महत्येनंतर तीने रेटला संसाराचा गाडा
By Admin | Updated: January 5, 2015 23:08 IST2015-01-05T23:08:20+5:302015-01-05T23:08:20+5:30
शेतकरी आत्महत्येमुळे ग्रामीण भागातील वातावरण अतिशय भयान झाले आहे. शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे. दुष्काळ, अतिवृष्टीमुळे पेरलेले पिकले नाही आणि उगवले त्याला भाव मिळाला नाही.

पतीच्या आत्महत्येनंतर तीने रेटला संसाराचा गाडा
गौरव देशमुख - वर्धा
शेतकरी आत्महत्येमुळे ग्रामीण भागातील वातावरण अतिशय भयान झाले आहे. शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे. दुष्काळ, अतिवृष्टीमुळे पेरलेले पिकले नाही आणि उगवले त्याला भाव मिळाला नाही. अशा अवस्थेत शेतकरी सरकारकडे अपेक्षा लावून आहे. असे असताना वर्धा जिल्ह्यातील तळेगाव (टालाटुले) येथे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची पत्नी रंजना रमेश देशमुख हिने स्वत:च्या हिमतीवर, घाम गाळून शेती फुलवून, संसाराचा गाडा यशस्वीपणे रेटला. आत्महत्येच्या गर्तेत वावरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी रंजनाचे कर्तुत्त्व प्रेरणादायी ठरणारे आहे.
वर्धा तालुक्यातील तळेगाव (टा.) येथील रमेश चपंतराव देशमुख या शेतकऱ्याने २७ जुलै २००४ रोजी नापिकी व कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. ही आत्महत्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजली. याची दखल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी घेतली. त्यांनी रंजना देशमुख यांच्या घरी येवून सांत्वन केले. आधार हरविलेल्या रंजना देशमुख यांच्या कुटुंबीयासाठी मदतही केली. मात्र ही मदत आयुष्यभर पुरणारी नव्हती. त्यामुळे रंजना यांनीच कुटुंबाची जबाबदारी घेतली. पतीच्या आत्महत्येनंतर दोन मुली आणि एका मुलाला जगविण्यासाठी, स्वत:कडे असलेल्या तीन एकर शेतीत राबायला सुरुवात केली. मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण यात कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणे तिच्यासाठी आव्हानच होते. मात्र त्या खचल्या नाही, नवऱ्याने केलेली चूक तिने केली नाही. जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर व मुलांचे संगोपन करण्याच्या तळमळीने ती शेतीत घाम गाळू लागली. पेरणी, निंदन, फवारणी, कापूस वेचाई सारेच काम स्वत:च करु लागली. तिच्या मेहनतीला फळ आले. मुलांचे दोन वेळेचे पोट भरेल, एवढी मिळकत तिला मिळू लागली. पुढे मुलीच्या लग्नाचा प्रश्न तीला भेडसावू लागला. मुलांच्या शिक्षणासाठी पैसे पुरत नसल्याने, त्यांनाही मजुरीला पाठवून लग्नासाठी पैसा गोळा केला. २००८ मध्ये मोठ्या मुलीचे लग्न केले. एकीचा लग्नाचा भार कसाबसा उतरल्यानंतर दुसरीच्या लग्नासाठी झुंज द्यावी लागली. शेतीतून आलेल्या मिळकतीतून लग्नासाठी गोळा केलेला पैसा अपुरा पडल्याने पुन्हा कर्ज काढावे लागले. २०१२ मध्ये दुसऱ्या मुलीचाही संसार थाटून दिला.
गेल्यावर्षी अतिवृष्टी तर यावर्षी कोरडा दुष्काळ यामुळे शेतीचेही नुकसान झाले. मात्र इतरांसारखी न खचता अडचणीशी झुंज देत जिद्दीने या अस्मानी संकटाचा तीने सामना केला.
प्रामाणिक प्रयत्न केल्यास, आयुष्यात नक्कीच नवी पहाट होईल
घरी सोनिया गांधी आल्या होत्या. त्यांनी आर्थिक मदतीबरोबरच एकाला नोकरी व शेतीला लागून असलेल्या नाल्याचे रूंदीकरण करून देण्याचे आश्वासन दिले होते. या दोन्ही आश्वासनांची अजूनही पूर्ती झाली नाही. मात्र अपेक्षा धरून मी बसले नाही. मुलांना जगविण्यासाठी, संकटाचा सामना केला. त्यात यशस्वीही ठरले. कर्जाच्या बोझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांनीही खचून न जाता, जगण्याची तळमळ ठेवल्यास, प्रामाणिक प्रयत्न केल्यास, आयुष्यात नक्कीच नवी पहाट होईल.
- रंजना रमेश देशमुख, मृतक शेतकऱ्याची पत्नी