आश्वासनानंतर अंध दाम्पत्याचे उपोषण मागे
By Admin | Updated: May 1, 2016 02:11 IST2016-05-01T02:11:19+5:302016-05-01T02:11:19+5:30
पुरात वाहून गेलेल्या घराच्या मोबदल्यात नवीन भूखंडाची जागा देण्याच्या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारपासून

आश्वासनानंतर अंध दाम्पत्याचे उपोषण मागे
मुख्याधिकारी: दीड महिन्यात देणार भूखंड
आर्वी : पुरात वाहून गेलेल्या घराच्या मोबदल्यात नवीन भूखंडाची जागा देण्याच्या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारपासून आर्वीतील शिवाजी चौकात मोहन कुळकर्णी व लता कुळकर्णी या अंध दाम्पत्यांचे आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणाची दखल घेत दीड महिन्यात दाम्पत्यांना जागेचा भूखंड देण्याच्या अटीवर हे उपोषण शनिवारी सकाळी मागे घेण्यात आले.
या उपोषण मंडपाला उपविभागीय अधिकारी मनोहर चव्हाण, न.प.चे मुख्याधिकारी विजय देशमुख, बांधकाम सभापती संजय थोरात, मुख्यलिपिक प्रकाश पाचघरे, दिलीप खंडेलवाल आदींनी भेट दिली. यावेळी उपविभगीय अधिकारी व मुख्याधिकाऱ्यांनी कुळकर्णी दाम्पत्यांशी चर्चा करून त्यांना दीड महिन्याच्या अवधित भूखंड देण्याचे मान्य केल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी महाराष्ट्र अपंग मित्र परिवाराचे सुधाकर भेदे, सूर्यप्रकाश भेदड, प्रकाश बावरी, प्रकाश बिजवे, हिरासिंग बावरी, सैय्यद फारूख, मिलिंद मोतेवार यांची उपस्थिती होती.(तालुका प्रतिनिधी)