शहरातील २९ दुकानांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 05:00 AM2020-07-02T05:00:00+5:302020-07-02T05:00:17+5:30
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी गत साडेतीन महिन्यांपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिली. व्यावसायिकांचे होणारे नुकसान लक्षात घेता अटी, शर्थींवर तसेच नियमांचे पालन करूनच दुकाने उघडण्याची परवानगी दिली. परंतु, काही व्यावसायिकांकडून मात्र, नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण बघता शहरातील व्यावसायिकांना सोशल डिटन्सिंगचे पालन करूनच प्रतिष्ठाने उघडण्यास परवानगी दिली होती. पण, काही व्यवसायिकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे बुधवारी सकाळच्या सुमारास शहरातील २९ व्यावसायिकांवर कारवाई करीत त्यांच्याकडून १४ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी गत साडेतीन महिन्यांपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिली. व्यावसायिकांचे होणारे नुकसान लक्षात घेता अटी, शर्थींवर तसेच नियमांचे पालन करूनच दुकाने उघडण्याची परवानगी दिली. परंतु, काही व्यावसायिकांकडून मात्र, नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र दिसून आले.
दुकानांसमोर पाच फूट अंतरावर आळे करून त्यामध्येच ग्राहकांना उभे ठेवून सोशल डिस्टन्सिंग पाळणे, दुकानात होणारी गर्दी टाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे, तोंडाला मास्क लावणे आदी नियम पाळूनच व्यावसायिकांनी आपले प्रतिष्ठाने उघडण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली होती. परंतु, बुधवारी सकाळच्या सुमारास नियोजित वेळेपूर्वीच दुकाने उघडल्याने तसेच दुकानांमध्ये गर्दी करणे, सॅनिटायझरचा वापर न करणे, सोशल डिस्टन्स न राखणाऱ्या लक्ष्मण गणेश पेटकर, मोहम्मद शफी, मोमीन शेख, सुनिल सवई, कांता मोरे, समीर खान पठाण, सुनिता ज्ञानेश्वर लोखंडे, शेख मुबारक, अंकुश देवठे, संजय मोरेश्वर बाकडे, माणिक वारसकर, अनिल माधव उमाटे, इंदू डहाके, विनोद नारायण नागतोडे, मनिष उमाटे, नरेंद्र देवढे, राजेंद्र भस्मे, दिनेश थूल, कल्पना रामटेके, मुरली उईके, शेख रुस्तम शेख लकी, पुरुषोत्तम अशोक अग्रवाल, रोहीत इंगोले, शैलेश मिराशी, मोहन उघडे, शेख नईम मेहमूद शेख, उमाकांत डहाके, शादाब शेख मेहमूद शेख, संजय भोयर अशा २९ व्यावसायिकांवर कारवाई करून त्यांच्याकडून प्रत्येकी २०० रूपये वसूल करण्यात आला. ही कारवाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.
चौका-चौकांत युवकांचे टोळके
शहरातील बॅचलर रोड, आर्वीनाका परिसर, रामनगर परिसर, शास्त्री चौक, सर्कस मैदान, लोक विद्यालय शाळेचे मैदान आदी विविध ठिकाणी रात्रीच्या सुमारास युवकांचे टोळके मोठ्या संख्येने बसून असताना पोलिसांनी याकडे लक्ष देत अशांना समज देत त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे.
काही उपहारगृहांमध्ये जेवणावळी सुरूच
शहरातील हॉटेलचालक, उपहारगृह तसेच रेस्टॉरेंट मालकांना सायंकाळी सात वाजेपर्यंतच पार्सल सेवा उपलब्ध करून देण्याची परवानगी आहे. पण, काही हॉटेलमालकांनी रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवल्याने शहर पोलिसांनी शारातील पाच हॉटेल, भोजनावळींना सील ठोकले होते. पण, अजूनही शहरातील अनेक हॉटेल, उपहारगृहांमध्ये रात्रीच्या जेवणावळी सुरू असून त्याकडेही पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे.