अनियंत्रित वाहतुकीमुळे अपघाताचा धोका
By Admin | Updated: January 14, 2015 23:14 IST2015-01-14T23:14:31+5:302015-01-14T23:14:31+5:30
वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्याकरिता पोलिसांना प्रयत्न करावे लागतात; पण येथील चौकात ते होताना दिसत नाही़ यामुळे शालेय विद्यार्थ्यांची मेडिकल चौकातील गर्दी आणि गलका अपघाताला

अनियंत्रित वाहतुकीमुळे अपघाताचा धोका
सेवाग्राम : वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्याकरिता पोलिसांना प्रयत्न करावे लागतात; पण येथील चौकात ते होताना दिसत नाही़ यामुळे शालेय विद्यार्थ्यांची मेडिकल चौकातील गर्दी आणि गलका अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहे़ शाळा व पालकांनी या विद्यार्थ्यांना समज देणे गरजेचे झाले आहे़
मेडिकल चौक हा वर्दळीचा आहे़ येथूनच कांढळी, जाम आणि सेवाग्राम व पूढे असे प्रमुख मार्ग गेले आहेत़ या मार्गावर मोठी वाहतूक असते. यात दुचाकी ते अवजड वाहनांचा समावेश असतो़ यातच धुम स्टाइलने दुचाकी दामटणाऱ्या युवकांची भर पडते़ टिप्पर, ट्रक आणि आता ऊसाच्या ट्राल्या नियमित सुरू आहेत़ यातच सायंकाळी करंजी मार्गावरील शाळा सुटली की सायकलने व पायी जाणारे विद्यार्थी रोड व्यापून टाकतात. अनेक बालके तर कशाचीही तमा न बाळगता सैरावैरा धावतात वा सायकल चालवितात. काही चौकात हल्लागुल्ला करताना आढळून येतात. चौकात गटागटाने थांबत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होतो़ यात आपण चौकातील वर्दळीच्या ठिकाणी थांबलो आहोत, याचे भानही विद्यार्थ्यांना नसते़ रोड व चौकातील विद्यार्थ्यांची वागणूक धोक्याची ठरत आहे़ यामुळे अपघात टाळण्यासाठी पालकांनी जबाबदारीने पाल्यानां सूचना देणे गरजेचे आहे. शिवाय येथे वाहतूक पोलिसाची नेमणूक करणे गरजेचे झाले आहे़(वार्ताहर)