९५ शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 05:00 IST2020-06-28T05:00:00+5:302020-06-28T05:00:23+5:30
अजूनही अनेक शेतकऱ्यांना बँकांकडून पीककर्ज देण्यात आलेले नाही. काही शेतकऱ्यांनी उसणवारी आणि सौभाग्यवतीचे दागीने गहाण ठेऊन बियाण्यांची खरेदी करून त्याची लागवड केली; पण तब्बल ९५ शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनचे बियाणे अंकुरलेच नसल्याचे वास्तव आहे. तशी नोंदही कृषी विभागाने घेतली आहे.

९५ शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांचा फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोना संकटातही जिल्ह्यातील शेतकरी मोठा धाडस करून विविध पिकांची लागवड करीत आहे. असे असले तरी आतापर्यंत जिल्ह्यातील तब्बल ९५ सोयाबीन उत्पादकांना बोगस बियाण्यांचा फटका बसल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.
प्राप्त माहितीनुसार, यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ७९ हजार २१.२ हेक्टरवर सोयाबीनची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. परंतु, मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अंकुरलेले पीक करपण्यास सूरूवात झाली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे असे शेतकरी पिकांना ओलित करून अंकुरलेले पीक वाचविण्यासाठी धडपड करीत आहेत.
तर अजूनही अनेक शेतकऱ्यांना बँकांकडून पीककर्ज देण्यात आलेले नाही. काही शेतकऱ्यांनी उसणवारी आणि सौभाग्यवतीचे दागीने गहाण ठेऊन बियाण्यांची खरेदी करून त्याची लागवड केली; पण तब्बल ९५ शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनचे बियाणे अंकुरलेच नसल्याचे वास्तव आहे. तशी नोंदही कृषी विभागाने घेतली आहे.
बियाणेच अंकुरले नसल्याने या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. नुकसानग्रस्त सोयाबीन उत्पादकांना तातडीने शासकीय मदत कृषी विभागाने मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.
नुकसान भरपाईसाठी ग्राहक मंचात मागावी लागेल दाद
सोयाबीनच्या बोगस बियाण्यांची विक्री करणाºया कंपन्यांवर कठोर कारवाई न करता कुंभकर्णी झोपेचे सोंग घेऊन असलेल्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर सध्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जि.प. कृषी विभागाच्या सूचनेवरून काही बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्या सध्या शेतकऱ्यांना सोयाबीनचे बियाणे बदलून देत असले तरी लागवडीसाठी लागलेल्या खर्चाची नुकसान भरपाई मिळविण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ग्राहक मंचात दाद मागावी लागणार आहे.
कृषी विभागाचा अहवाल महत्त्वाचा
नुकसानग्रस्त शेतकऱ्याला नुकसान भरपाईसाठी ग्राहक मंचात दाद
मागताना कृषी विभागाकडून त्यांनी
केलेल्या सर्वेक्षणाबाबतचा अहवाल प्राप्त करून तो सदर प्रस्तावाला सलग्न
करावा लागणार आहे.
शिवाय बियाणे खरेदी केल्याचे बिल आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे जोडावी लागणार आहे.