८४ हजार लाभार्थी धान्यापासून वंचित
By Admin | Updated: January 23, 2015 01:59 IST2015-01-23T01:59:45+5:302015-01-23T01:59:45+5:30
शासनाद्वारे गोर-गरिबांना स्वस्त धान्याचा पुरवठा केला जातो़ गरजवंतांना लाभ देण्याकरिता अंत्योदय, बीपीएल, एपीएल व शुभ्र कार्डधारक असे चार प्रकार करण्यात आले आहेत़ ...

८४ हजार लाभार्थी धान्यापासून वंचित
प्रशांत हेलोंडे वर्धा
शासनाद्वारे गोर-गरिबांना स्वस्त धान्याचा पुरवठा केला जातो़ गरजवंतांना लाभ देण्याकरिता अंत्योदय, बीपीएल, एपीएल व शुभ्र कार्डधारक असे चार प्रकार करण्यात आले आहेत़ यातील तीन शिधापत्रिकांवर स्वस्त धान्य दिले जाते; पण गत चार महिन्यांपासून एपीएल शिधापत्रिका धारकांना धान्यच देण्यात आलेले नाही़ यामुळे वर्धा जिल्ह्यातील ८४ हजार लाभार्थी धान्यापासून वंचित आहेत़
अंत्योदय शिधापत्रिका धारकांना मोफत तर बीपीएल शिधापत्रिका धारकांना २ ते ३ रुपये किलो प्रमाणे धान्य पुरवठा केला जातो़ या दोन्ही शिधापत्रिका धारकांचा धान्य, रॉकेल व खाद्य तेलाचा पुरवठा सुरळीत आहे; पण एपीएल धारकांकरिता धान्य आलेले नाही़ जिल्ह्यात ८४ हजार ८९४ एपीएल कार्डधारक नागरिक आहेत़ या नागरिकांना ७ रुपये २० पैसे किलोप्रमाणे २० किलो गहु आणि ९ रुपये ६० पैसे दराने १० किलो तांदळाचा पुरवठा केला जात होता़ स्वस्त धान्य दुकानांमार्फत मिळणारा हा पुरवठा आॅक्टोबर महिन्यापर्यंत सुरळीत सुरू होता; पण यानंतर धान्य पुरवठाच करण्यात आला नाही़ जिल्ह्यातील ८४ हजार ८९४ लाभार्थ्यांकरिता १,२२१ मेट्रीक टन धान्याची गरज आहे. यात ८१४ मेट्रीक टन गहु आणि ४०७ मेट्रीक टन तांदुळ आहे. हा धान्य पुरवठा चार महिन्यांपासून बंद असल्याने लाभार्थ्यांना धान्याचे वितरण करण्यात आलेले नाही़ यामुळे त्यांना महागडे धान्य खरेदी करून उदरनिर्वाह करावा लागत आहे़ खुल्या बाजारात गहु, तांदुळ व अन्य धान्याचे भाव वधारलेले आहेत़ हे महागडे धान्य खरेदी करताना सामान्यांची चांगलीच परवड होत आहे़
अंत्योदय, बीपीएल व एपीएल शिधापत्रिका धारकांसाठी नोंदविलेल्या मागणीप्रमाणे जिल्ह्याला धान्याचा कोटा पुरविला जात होता; पण आॅक्टोबर महिन्यापासून शासनाकडून एपीएल शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांचा कोटा वगळून धान्य पुरवठा केला जात आहे़ यामुळे एपीएल कार्डधारकांना धान्य पुरवठा करणे अशक्य झाले आहे़
गोदामांत सडतेय धान्य
शासनाकडून गोरगरिबांना शिधापत्रिकांवर धान्य पुरवठा केला जातो़ गोदामात साठवून ठेवलेले धान्यच स्वस्त धान्य दुकानांमार्फत नागरिकांना दिले जाते़ आता एपीएलचा धान्य पुरवठा बंद करण्यात आल्याने गोदामांमध्ये सडणाऱ्या धान्यात भर पडणार आहे़
आॅक्टोबर महिन्यापर्यंत शासनाचा एपीएल शिधापत्रिका धारकांना धान्य पुरवठा सुरू होता; पण त्यानंतर एपीएलसाठी लागणारा १२२१ मेट्रीक टन धान्याचा पुरवठाच करण्यात आलेला नाही़ यामुळे शिल्लक साठ्यातून नोव्हेंबरपर्यंत नागरिकांना धान्य दिले़ त्यानंतर ते शक्य झाले नाही़ शासनानेच कोटा बंद केल्याने पुरवठा विभाग एपीएल कार्डधारकांना धान्य पुरवठा करण्यात असमर्थ आहे़
- एक़े़ सवाई, जिल्हा पुरवठा अधिकारी, वर्धा़
पालकमंत्र्यांकडे धाव
एपीएल शिधापत्रिका धारकांचा धान्य पुरवठा सुरळीत सुरू ठेवावा, या मागणीसाठी माजी जि़प़ सदस्य दिलीप अग्रवाल यांनी जिल्हा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन सादर केले आहे़ यातून अतिरिक्त धान्य गोदामात सडण्यापेक्षा नागरिकांना पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे़
नोव्हेंबरपर्यंत पुरविले धान्य
सप्टेंबर आणि आॅक्टोबर २०१४ या महिन्यांपर्यंत धान्याचा संपूर्ण कोटा सुरळीतपणे सुरू होता़ नोंदविलेल्या मागणीनुसारच धान्याचा पुरवठा केला जात होता; पण त्यानंतर एपीएल धारकांचा कोटा पुरविण्यातच आला नाही़ असे असले तरी जिल्हा पुरवठा विभागाकडे शिल्लक असलेल्या साठ्यातून नोव्हेंबर महिन्यापर्यंत एपीएल शिधापत्रिका धारकांना धान्याचा सुरळीत पुरवठा करण्यात आला़ यानंतर कोटाच न आल्याने धान्य पुरवठा करणे अशक्य झाले आहे़