जिल्ह्यात ८०९ विहिरींचे काम रखडले
By Admin | Updated: March 16, 2015 01:36 IST2015-03-16T01:36:16+5:302015-03-16T01:36:16+5:30
नरेगाअंतर्गत जिल्ह्यात १ हजार ८४१ सिंचन विहिरींचे कामे असून धडक सिंचन विहिरी अंतर्गत ८६० विहिरी घेण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात ८०९ विहिरींचे काम रखडले
वर्धा : नरेगाअंतर्गत जिल्ह्यात १ हजार ८४१ सिंचन विहिरींचे कामे असून धडक सिंचन विहिरी अंतर्गत ८६० विहिरी घेण्यात आल्या आहेत. अतिवृष्टीमुळे खचलेल्या विहिरी संदर्भात संबंधित यंत्रणेने प्रत्यक्ष पाहणी करून कामांचे अदांजपत्रक तयार करावे व प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याच्या सूचना मनरेगा आयुक्त मुध्युकृष्णन संकरनारायण यांनी दिल्यात.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अतिवृष्टीमुळे खचलेल्या विहिरींचे कामे प्राधान्यांने पूर्ण करण्यासोबतच धडक व जवाहर योजनेतील मंजूर विहिरी मनरेगा अंतर्गत ३० जून पूर्वी पूर्ण करण्यासंदर्भात नियोजन करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. बचत भवन येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींच्या कामांचा आढावा तसेच प्रत्यक्ष अमलबजावणी करतांना येणाऱ्या अडचणी संदर्भात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यपालन अधिकारी संजय मीना, अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत, सहआयुक्त शरद भगत, रोहयो उपजिल्हाधिकारी शिरीष पांडे, रोहेयोचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी राजेंद्र भुयार यांच्यासह संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील अपूर्ण विहिरी संदर्भात क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडचणी सोडविण्यात आल्या असल्याचे सांगताना आयुक्त एम. संकरनारायण म्हणाले की विहिरीचे बांधकाम करतांना क्रेनच्या वापरासोबतच बांधकामासंदर्भात शासनाने नव्याने सूचना दिल्या असल्यामुळे सिंचन विहिरी पूर्ण करण्यासाठीच्या अडचणी राहणार नाहीत.
नवीन सिंचन विहिरी मंजूर करतांना इतर अकुशल कामे प्राधान्याने घेतांना संबंधित लाभार्थ्यांच्या जमिनीवर वृक्ष अथवा फळझाड लागवड, शेततळे भुसुधारणेची कामे प्राधान्याने घेण्याचेही ते यावेळी म्हणाले.
जिल्ह्यातील सिंचन विहिरी संदर्भात तसेच मनरेगा अंतर्गत येणाऱ्या अडचणी बाबत मुख्यकार्यपालन अधिकारी संजय मीणा यांनी माहिती दिली. मनरेगाचे सहआयुकत शरद भगत यांनी अंमलबजावणी यंत्रणांना येणाऱ्या अडचणी सोडवतांना अपूर्ण सिंचन विहिरी प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्यात.
अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी स्वागत केले. यावेळी जिल्ह्यातील खंडविकास अधिकारी, सिंचन, बाधकाम, सामाजिक वनीकरण तसेच पाणी पुरवठा आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)