७ लाख क्विंटल कापूस शेतकऱ्यांकडे पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:01 IST2020-05-03T05:00:00+5:302020-05-03T05:01:01+5:30
महाराष्ट्रात विशेषत: विदर्भात सर्वात जास्त कापूस उत्पादक शेतकरी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण देशात लॉकडाऊन असल्यामुळे सीसीआय व बाजार समितीच्यावतीने खरेदी केंद्र बंद होते त्यामुळे शेतकऱ्यांचा कापुस घरीच शिल्लक असल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

७ लाख क्विंटल कापूस शेतकऱ्यांकडे पडून
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्हयात सुमारे २६ लाख क्विटंल कापसाचे उत्पादन झाले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी सीसीआयची कापूस खरेदी बंद होईपर्यत १९.५० लाख क्विटंल कापसाची खरेदी झाली होती. शेतकऱ्यांकडे सुमारे ७ लाख क्विंटल कापूस शिल्लक असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीसीआय खरेदी केंद्र बंद करण्यात आले होते. बंद झालेले सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याकरिता केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री, सीसीआयचे अध्यक्ष , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, पणनमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे खा. रामदास तडस यांनी पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील बहुतांश सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरु झाले आहे. सोमवारी सेलू सह आणखी काही कापूस खरेदी केंद्र सुरू होतील अशी माहिती खासदार रामदास तडस यांनी वायगांव येथे दिली. सिंधानिया जिनिंग कंपनीत सीसीआय कापूस खरेदी केंद्राला खासदारांनी शनिवारी भेट दिली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्याम कार्लेकर, जिल्हा निंबधक गौतम वालदे, जिनिंगचे मालक पवन सिंघानिया, अंकीत सिंघानिया, बाजार समितीचे सचिव समीर पेंडके, सदस्य विजय बंडेवार, सदस्य मुकेश अळसपूरकर, सदस्य शरद झोड, सदस्य दत्ताजी महाजन, मिलींद भेंडे, सीसीआय ग्रेडर बोखले व रमेशकुमार उपस्थित होते.
महाराष्ट्रात विशेषत: विदर्भात सर्वात जास्त कापूस उत्पादक शेतकरी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण देशात लॉकडाऊन असल्यामुळे सीसीआय व बाजार समितीच्यावतीने खरेदी केंद्र बंद होते त्यामुळे शेतकऱ्यांचा कापुस घरीच शिल्लक असल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
१०० वाहनातून दररोज कापूस घेणार
घोराड : सर्वत्र कापूस खरेदी केंद्र सुरू झाले असताना सेलू बाजारपेठेत कापसाची खरेदी करण्यात येत नव्हती. या तालुक्यातील कापूस आर्वीच्या बाजारपेठेत जाणे सुरू झाला. ही बातमी लोकमतमध्ये झळकताच बाजार समितीने पुढाकार घेत सीसीआय व खासगी व्यापारी यांची ३० एप्रिल व १ मे अशा दोन दिवस बैठका झाल्यात.त्यानंतर सोमवारपासून कापूस खरेदी सुरू करण्याचे ठरविण्यात आले.
सीसीआय व खासगी व्यापारी हे कापूस खरेदी करणार असून सकाळी ८ वाजताच लिलाव होणार आहे. शनिवार व रविवार वगळता दररोज केवळ १०० वाहनांतून येणारा कापूस खरेदी केला जाणार आहे. या मुळे कापूस खरेदी लांबणार असली तरी शासनाने कोरोना व संचारबंदीत ठरवून दिलेल्या निर्देशानुसार होणार आहे. बाजार समितीने पुढाकार घेत व यांना व्यापाऱ्यांनी दिलेली साथ पाहता आता कापूस उत्पादकांचा घरी असलेला कापूस घराबाहेर निघणार असून शेतकºयांसमोरील आर्थिक संकट दूर होणार आहे.
सीसीआय व खासगी व्यापाऱ्यांची बैठक बोलावली. यात सोमवारपासून कापूस खरेदी करण्याचा निर्णय झाला असून शनिवारी तशी यादी सूचना फलकावर प्रसिद्ध केली जाईल. शेतकऱ्यांनी कापूस खरेदीत बाजार समितीला सहकार्य करावे.
- विद्याधर वानखेडे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, सिंदी.