आठ वर्षांत ५३ लाखांचा वृक्षकर
By Admin | Updated: June 4, 2014 23:55 IST2014-06-04T23:55:48+5:302014-06-04T23:55:48+5:30
सर्वत्र हिरवळ रहावी, वृक्षलागवड व्हावी याकरिता शासनाने प्रत्येक स्वायत्त संस्थेला शहरातील नागरिकांकडून वृक्षकर वसूल करण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार वर्धा नगरपरिषदेने वृक्षकराच्या नावावर

आठ वर्षांत ५३ लाखांचा वृक्षकर
शहरातून हिरवळ बेपत्ता : पालिकेची कराच्या नावावर वसुली मात्र सुरू
रूपेश खैरी - वर्धा
सर्वत्र हिरवळ रहावी, वृक्षलागवड व्हावी याकरिता शासनाने प्रत्येक स्वायत्त संस्थेला शहरातील नागरिकांकडून वृक्षकर वसूल करण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार वर्धा नगरपरिषदेने वृक्षकराच्या नावावर गत आठ वर्षांत तब्बल ५३ लाख ५३ हजार ९७७ रुपये वसूल केले. त्या तुलनेत शहरात वृक्षसंवर्धन सोडा वृक्षलागवडही झाल्याची नोंद पालिकेत नसल्याचे खळबळजनक वास्तव आहे. पालिकेच्यावतीने कधी वृक्षलागवड झाली नसल्याने आज शहरातून हिरवळ बेपत्ता झाल्याचे चित्र आहे.
ग्लोबल वॉर्मिंगमुळे उष्णतेत वाढ होत आहे. यावर आळा घालण्याकरिता वृक्षलागवड हा एकमेव मार्ग असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे शासनाने स्वायत्त संस्थांना त्यांच्या करआकारणीत वृक्षकर वसूल करण्याच्या सूचना दिल्या. या करातून वसूल झालेल्या रकमेतून शहरात वृक्षांची लागवड करावी व त्यांचे संगोपन करावे अशा सूचनाही करण्यात आल्या होत्या. या सूचनेनुसार वर्धा नगर परिषदेच्या प्रत्येक महिन्याचा कर आकारताना त्यात वृक्षकर आकारण्यात येतो. तो नागरिकांकडून नियमित आकारण्यात वसूलही करण्यात येतो. वर्षाकाठी एकमुस्त कर आकारण्याचा सपटा पालिकेच्यावतीने करण्यात येत असला तरी त्यांच्याकडून त्या रकमेचा वापर दुसर्याच कामावर होत असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. येथील महिती अधिकार कार्यकर्ता नरेंद्र कांबळे यांनी ही माहिती अधिकाराचा वापर करून बाहेर काढली आहे.
वृक्षकाराच्या नावावर वसूल केलेला कर वृक्षलागवड व त्याच्या संवर्धनाकरिता होणे गरजेचे आहे; मात्र वर्धेत तसे होताना दिसत नाही. शहराच्या सौदर्यीकरणाकरिता पालिकेच्यावतीने विविध उपाय योजना आखण्यात येत आहे; मात्र वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाकरिता कुठल्याही उपाययोजना आखण्यात येत नाही. शहरातील मुख्य मार्गावर कुठेही सावलीकरिता माठे वृक्ष राहिले नाही. नागरिकांनी सावलीकरिता कुणाच्यातरी दुकानाचा वा घराचा आधार घ्यावा लागत आहे. असे असतानाही पालिकेच्यावतीने शहरात वृक्षलागवड मोहीम राबविल्या जात नाही.