प्रकल्पासाठी ५०० कोटी
By Admin | Updated: May 6, 2016 01:51 IST2016-05-06T01:51:45+5:302016-05-06T01:51:45+5:30
निम्न वर्धा प्रकल्प पूर्ण करण्याकरिता यावर्षी ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून जमिनीचे अधिग्रहण व शेतकऱ्यांना मोबदला तसेच पाटचऱ्याची कामे प्राधान्याने पूर्ण करा, ....

प्रकल्पासाठी ५०० कोटी
गिरीष महाजन : निम्न वर्धा प्रकल्पाचे काम तत्काळ पूर्ण करा
आर्र्वी : निम्न वर्धा प्रकल्प पूर्ण करण्याकरिता यावर्षी ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून जमिनीचे अधिग्रहण व शेतकऱ्यांना मोबदला तसेच पाटचऱ्याची कामे प्राधान्याने पूर्ण करा, अशा सूचना राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी गुरुवारी निम्न वर्धा प्रकल्पाला भेट देऊन पाहणी करताना दिल्यात.
यावेळी आ. रणजित कांबळे, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय.एस. चहल, मुख्य अभियंता संजय बर्वे, अधीक्षक अभियंता गवळी, दत्तात्राय रब्बेवार, मंडवार आदी अधिकारी उपस्थित होते.
निम्न वर्धा प्रकल्पांतर्गत पाण्याखाली येणाऱ्या क्षेत्रातील जमीन अधिग्रहणाचे काम जलद गतीने पूर्ण करून त्यांना तात्काळ मोबदला देण्याच्या सूचना देताना जलसंपदा मंत्री गिरीष महाजन म्हणाले की, पहिल्या टप्प्यात यावर्षी १४० दलघमी पाणी व मार्च १८ पर्यंत २१७ दलघमी जलसाठा निर्माण करा, यासाठी कालबद्ध कार्यक्रमा तयार करा, अशाही सूचना यावेळी दिल्या. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचवून त्यांना प्रत्यक्ष लाभ देण्यासाठी पाटचऱ्याची कामे पूर्ण करतानाच पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी बंद पाईपलाईनचा वापर तसेच ठिबक सिंचन पद्धतीचा जास्तीत जास्त वापर करण्यासंदर्भात प्रायोगिक प्रकल्प राबवा, असेही ना. गिरीष महाजन यांनी सांगितले.
प्रकल्पासाठी तसेच पाणी वितरिका पूर्ण करण्यासाठी जमिनीचे अधिग्रहण करतानाच थेट खरेदी पद्धतीचा अवलंब करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन सिंचनामुळे होणाऱ्या लाभाबाबतही माहिती द्या, असेही जलसंपदा मंत्र्यांनी सांगितले.
आ. कांबळे यांनी निम्न वर्धा प्रकल्पातील मुख्य कालवा तसेच पाटचऱ्या प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी जमिनीचे अधिग्रहण कामाला गती द्यावी. तसेच शेतकऱ्यांना प्राधान्यांना योग्य मोबदला देण्याची सूचना केली.
शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाटचऱ्याचे कामे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव चहल यांनी प्रकल्पाचे काम, मुख्य पाणी वितरिका तसेच पुलगाव खर्डा बॅरेज व आर्वी उपसा योजनेच्या कामाचे प्रस्ताव तयार करा, यासाठी आवश्यक निधीची मागणी करण्यात येईल, असे सांगितले. मुख्य अभियंता संजय सुर्वे यांनी प्रकल्पाच्या कामाबद्दल माहिती दिली. यावेळी सहायक कार्यकारी अभियंता हासे, गणेश गोडे, इरफान शेख, इमरान राही, विजय नाखले, सुहास पाटील, रमण लायचा, पंकज लोखंडे आदी अभियंता उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)
वर्धा नदीवर जलसाठा निर्माण करून सिंचनासाठी उपयुक्त ठरणाऱ्या पुलगाव बॅरेजच्या कामांना मान्यता मिळाली असून कामाला सुरुवात झाली आहे. खर्डा बॅरेज तसेच आर्वी उपसा योजनेच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. निम्न वर्धा प्रकल्प बाधीतांना अनेक दिवसांपासून नागरी सुविधा नसून त्या देण्याचीही मागणी करण्यात आली.