५० बालके शाळाबाह्य
By Admin | Updated: February 5, 2016 01:36 IST2016-02-05T01:36:19+5:302016-02-05T01:36:19+5:30
एकही बालक प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना आहेत.

५० बालके शाळाबाह्य
सहा महिने संपले : मोहिमेनंतरही सर्वेक्षण सुरूच
रूपेश खैरी वर्धा
एकही बालक प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना आहेत. याकरिता शासनाच्या वतीने विविध योजना अंमलात आणल्या जात आहे. असे असताना वर्धा जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणात एकूण ५० बालके शाळाबाह्य असल्याचे उघड झाले आहे. या बालकांना शाळेत प्रवेश देण्यात आल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे.
शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही, याकरिता राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्यावतीने मोफत शिक्षण कायदा अंमलात आणला. त्याचा लाभ सर्वांना देण्याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यातून बालकांना शिक्षण देण्याचा प्रयत्न आहे. अशातही जिल्ह्यातच नाही तर राज्यात मोठ्या प्रमाणात बालके शिक्षणापासून दूर असल्याचे निदर्शनास आले. यामुळे एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही, या शासनाच्या उद्देशाला हरताळ फासल्या जात असल्याचे दिसून आले. राज्यात सर्वत्र १५ जुलै ते जानेवारीपर्यंत सर्वेक्षण करण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यानुसार वर्धेतही ३१ जानेवारीपर्यंत आठही पंचायत समितीत सर्वेक्षण करण्यात आला. हा सर्वेक्षण करण्याकरिता काही स्वयंसेवी संस्थांना सहभागी करण्यात आले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात सर्वेक्षण करण्यात आले. यात जिल्ह्यात थोडीथोडकी नाही तर ५० बालके शाळाबाह्य असल्याचे दिसून आले आहे. हा आकडा गत वर्षीच्या तुलनेत अत्यल्प असल्याचे सांगण्यात येत आहे.
वर्धेतील वडार वस्तीत सकाळी केले सर्वेक्षण
शासनाच्या सूचनेवरून जानेवारी महिन्यापर्यंत सर्वेक्षण करून शाळाबाह्य मुलांचा शोध घेत त्यांच्या परिसरातील शाळेत त्यांना दाखल करण्याच्या शासनाच्या सूचना होत्या. शासनाची कालमर्यादा संपली तरी वर्धेत सर्व्हे सुरू आहे. गुरुवारी सकाळी वर्धा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिरी एस. कोडापे यांच्या मार्गदर्शनात वर्धेत आर्वी नाका परिसरात सर्व्हे करण्यात आला. येथे एका शाळाबाह्य मुलाची नोंद करण्यात आली. तर इतवारा परिसर व दयाल नगर भागात केलेल्या सर्व्हेत एकूण चार शाळाबाह्य मुले आढळूून आली. शिक्षण विभागाच्यावतीने सुरू करण्यात आलेले हे सर्वेक्षण असेच सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ५० शाळाबाह्य बालकांचा समावेश करण्यात आला होता. यात गुरुवारी सकाळी वर्धा गटशिक्षणाधिकाऱ्यांतर्फे सर्वेक्षण करण्यात येत आहे. असे असले तरी शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोध मोहीम सुरूच राहणार आहे. आढळलेल्या बालकांना शाळेत दाखल करण्यात येत आहे.
- धनराज तेलंग, शिक्षणाधिकारी, जि.प.वर्धा