आष्टी तालुक्यातील ४७0 शेतकरी वीजजोडणीच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: May 24, 2014 23:50 IST2014-05-24T23:50:29+5:302014-05-24T23:50:29+5:30
विदर्भातील शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने पॅकेज देवून विहिरींसाठी भरघोस अनुदान दिले. विहिरीचे खोदकाम व बांधकाम पूर्ण झाल्यावर नवीन वीजजोडणीचे

आष्टी तालुक्यातील ४७0 शेतकरी वीजजोडणीच्या प्रतीक्षेत
आष्टी (शहीद) : विदर्भातील शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने पॅकेज देवून विहिरींसाठी भरघोस अनुदान दिले. विहिरीचे खोदकाम व बांधकाम पूर्ण झाल्यावर नवीन वीजजोडणीचे अर्ज विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात शेतकर्यांनी सादर केले. मात्र अधिकारी व कर्मचार्यांच्या दुर्लक्षित धोरणाचा फटका शेतकर्यांना बसला. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून तालुक्यातील ४७0 शेतकरी वीजजोडणीच्या प्रतिक्षेत आहे. याचा परिणाम पीक उत्पादनावर होणार असे संकेत दिसत आहेत. महिनाभरात खरीप हंगामाच्या पेरण्या सुरू होणार आहे. शेतकर्यांनी शेतीची नांगरणी तथा वेचणी करून ठेवली आहे. मजूर मिळत नसल्यामुळे शेतकरी स्वत: राबराब राबवून कष्ट करीत आहे. त्यातच पॅकेजची विहीर कर्जबाजारी होवून बांधली. त्यानंतर अनेक दिवसांनी अनुदान मिळाले. आता विहिरीचे काम पूर्ण झाल्यावर तात्काळ वीज जोडणीची अपेक्षा शेतकर्यांना होती. यासाठी तालुका स्तरावर असलेले विद्युत वितरण कंपनीच्या सहायक अभियंता कार्यालयात अर्ज सादर केले. संबंधित अधिकारी वेळकाढू धोरण अवलंबवित असल्याने शेतकर्यांना प्रचंड नुकसान झाले आहे. निसर्गाचे संतुलन बिघडल्यामुळे शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटाला सामोरे जाता जाता भुईसपाट होत आहे. तरीसुद्धा खरीपाची पिके सोडली तर रब्बी व उन्हाळी पीक येण्याची हमखास आशा आहे. त्यासाठी सिंचनाची व्यवस्था असणे अत्यंत महत्वाचे झाले आहे. या सर्व समस्यांचा विचार करणे विद्युत वितरण कंपनीच्या अधिकार्यांना आवश्यक आहे. येथील कार्यालयातील कर्मचारी आठवडाभर गैरहजर राहतात. अभियंता दुर्लक्षित धोरण अवलंबवित असल्यामुळे शेतकर्यांचे नुकसान होत आहे. वीजेशिवाय शेतात सिंचन कसे करायचे विचारात शेतकरी पुरता खचून गेला आहे. सन २00५ मध्ये विद्युत वितरण कंपनीने महिनाभरात शेतकर्यांना वीजजोडणी देण्याचे आदेश निर्गमित केले होते. शासकीय आदेशाची अंमलबजावणी करण्याचे काम संबंधित अधिकारी करीत नाही. यावर्षी शेतकरी अनेक संकटात आहे. हातात आलेली पीके हातून जात आहे. शासनाचे अनुदान मिळत नाही. तोंडाला पाने पुसणारी मदत पाहून अनुदान न दिलेले बरे! अशा प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहे. असे असतानाही जोडणी मात्र लवकर मिळण्यास तयार नसल्याने वीज जोडणी तात्काळ देण्याची मागणी शेतकर्यांनी निवेदनाद्वारे वरिष्ठांकडे केली आहे.(प्रतिनिधी)