४७ शेतकऱ्यांचे बयाण नोंदविले
By Admin | Updated: August 13, 2015 02:45 IST2015-08-13T02:45:01+5:302015-08-13T02:45:01+5:30
कृषी उत्पन्न बाजार समिती, सिंदी (रेल्वे) च्या बेदरकारपणामुळे येथील श्रीकृष्ण जिनिंग आणि प्रेसिंगच्या मालकाने परिसरातील शेकडो कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा ८ ते १० कोटींचा गंडा घातला.

४७ शेतकऱ्यांचे बयाण नोंदविले
कापूस चुकारा प्रकरण : तक्रारींना वारंवार वाटाण्याच्या अक्षता
सेलू : कृषी उत्पन्न बाजार समिती, सिंदी (रेल्वे) च्या बेदरकारपणामुळे येथील श्रीकृष्ण जिनिंग आणि प्रेसिंगच्या मालकाने परिसरातील शेकडो कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा ८ ते १० कोटींचा गंडा घातला. याप्रकरणी बुधवारी बाजार समिती, उपबाजार पेठ सेलू येथील कार्यालयात लवाद अंतर्गत ४७ शेतकऱ्यांचे बयाण नोंदविण्यात आले.
पैसे बुडविण्यासाठी बाजार समिती पुरेपूर जबाबदार असून दोघांच्या संगनमतानेच आम्हाला व्यापाऱ्याने गंडा घातला, असा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. शासनाने संबंधितांवर फौजदारी गुन्हे कायम करावे व कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आमचे बुडालेले पैसे वसूल करून ते परत मिळवून द्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहे. बुधवारी लवाद अंतर्गत ४७ शेतकऱ्यांचे बयाण न्यायाधिकरण अधिकारी तथा सहायक निबंधक सहकारी संस्था, समुद्रपूरच्या आर.व्ही. निनावे यांच्या समक्ष घेण्यात आले. यावेळी सर्व शेतकऱ्यांजवळील काटापट्टी व सौदापट्टी तपासून पाहण्यात आल्या. तक्रारकर्त्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शासन शेतकऱ्यांना मदत करण्यात अपयशी ठरत आहे. परंतु कमीत कमी आमच्या कष्टाचे पैसे तरी मिळवून देण्यास हातभार लावावा अशी मागणी सदर शेतकरी करीत आहे.
यापूर्वी फसगत झालेल्या काही शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती, सिंदी येथे लेखी तक्रारी दाखल केल्या होत्या. पण दखल घेण्याऐवजी त्यांना वाटाण्याच्या अक्षता दाखविण्यात आल्याचा आरोप मुकुंद खोडे यांच्यासह शेतकऱ्यांकडून केला जात आहे.(शहर प्रतिनिधी)