नुकसान भरपाईसाठी शेतकर्याची ३४ तास वीरुगिरी
By Admin | Updated: June 6, 2014 00:07 IST2014-06-06T00:07:50+5:302014-06-06T00:07:50+5:30
पॉवर ग्रीड कॉर्पाेरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीने टॉवरच्या बांधकामाचा बाजारभावानुसार योग्य मोबदला दिला नाही. तसेच दोन वर्षे शेती पडिक राहिल्यामुळे वायगाव(हळद्या) येथील प्रदीप सूर्यभान मून

नुकसान भरपाईसाठी शेतकर्याची ३४ तास वीरुगिरी
गुरुवारी आंदोलन उघडकीस : वायगाव (हळद्या) येथील घटना
समुद्रपूर :पॉवर ग्रीड कॉर्पाेरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीने टॉवरच्या बांधकामाचा बाजारभावानुसार योग्य मोबदला दिला नाही. तसेच दोन वर्षे शेती पडिक राहिल्यामुळे वायगाव(हळद्या) येथील प्रदीप सूर्यभान मून या शेतकरी युवकाने बुधवारपासून नुकसानभरपाईसाठी टॉवरवर चढून वीरुगिरी सुरु केली.
२0१२ ला पॉवर ग्रीड कॉर्पाेरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीने प्रदीप सूर्यभान मून यांच्या मालकीचे शेत सर्वे क्रमांक ५१४/२ मध्ये विद्युत लाईन टॉवर उभारणीला सुरुवात केली. कंपनीच्या अधिकार्यांनी टॉवर उभारणीसंबंधीचे सर्व व्यवहार प्रदीपचा मोठा भाऊ संदीप मून सोबत केले. प्रदीप बाहेरगावी असल्यामुळे त्याला कळविण्यात आले नाही. सुरुवातीला टॉवरचा पाया बांधणीचे ३५ हजार व त्यानंतर टॉवरच्या उभारणीचे ८४ हजार रुपये संदीपला देण्यात आले. उर्वरित रक्कम नंतर देण्याचे कंपनीच्या अधिकार्यांनी सांगितले. सर्व कागदापत्रांवर संदीप मूनच्या स्वाक्षर्या घेण्यात आल्या. त्त्याचा भाऊ प्रदीप मून ला या व्यवहाराची माहिती मिळाल्यानंतर ही रक्कम फार कमी मिळाल्याचे त्याच्या लक्षात आले. दोन वर्षापासून शेतातील विहिरीची टॉवरसाठी वीज कापण्यात आल्याने ओलीतही करता न आल्याने दोन वर्षे शेती पडिक राहिली. यात अंदाजे दहा लाखांचे नुकसान झाले. कंपनीच्या अधिकार्यांना भरपाईसंबंधी विचारले असता त्यांनी देण्यास टाळाटाळ केली. पालकमंत्री राजेंद्र मुळक, पोलीस उपविभागीय अधिकारी हिंगणघाट, ठाणेदार अनिल गिरडकर यांना निवेदन देण्यात आले. पण दुर्लक्ष करण्यात आल्याने प्रदीप मून याने टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले. पोलिस उपविभागीय अधिकारी व ठाणेदार गिट्टावार यांनी आंदोलनस्थळी जाऊन प्रदीपची मनधरणी केली; पण काहीही फायदा झाला नाही.(शहर प्रतिनिधी)