सौर कृषिपंपातून ३०० दिवस पाणी
By Admin | Updated: October 16, 2015 02:52 IST2015-10-16T02:52:12+5:302015-10-16T02:52:12+5:30
पारंपरिक पद्धतीने विद्युतीकरण न झालेल्या शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पाच एकरापेक्षा कमी असलेल्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.....

सौर कृषिपंपातून ३०० दिवस पाणी
आशुतोष सलील : तब्बल २० वर्षे वीज देयक भरण्यापासून सुटका
वर्धा: पारंपरिक पद्धतीने विद्युतीकरण न झालेल्या शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पाच एकरापेक्षा कमी असलेल्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ९२० शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या पंपामुळे शेतकरी वर्षातील ३०० दिवस ओलित करू शकेल. यामुळे सौर कृषीपंप जोडण्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे जिल्हाधिकारी आशुतोष सलील म्हणाले.
घोराड येथे देवराव तडस यांच्या शेतात सौर कृषिपंपाच्या प्रात्यक्षिकाची पाहणी जिल्हाधिकारी सलील यांनी गुरुवारी केली. सौर उर्जेद्वारा तीन अश्वशक्ती तसेच ५ व ७.५ अश्वशक्ती सौरपंपाद्वारा शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध होऊ शकते. शेतकऱ्यांना सौर उर्जेवर कृषी पंपाची प्रत्यक्ष पाहणी करता यावी याकरिता या प्रात्याक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते.
सौर कृषीपंप योजना ही आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये केंद्र व राज्य शासनाचे अनुदान असून लाभार्थ्यांना केवळ ५ टक्के मिळवून सौर कृषीपंप महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. धडक सिंचनचे लाभार्थी, अतिदुर्गम भागातील शेतकरी तसेच ज्या गावात विद्युतीकरण झाले नाही, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा प्राधान्याने लाभ मिळणार आहे.
सौर कृषीपंप योजनेचे प्रात्यक्षिक घोराड तसेच समुद्रपूर येथे आयोजित करण्यात आले असून या योजनेंतर्गत तीन अश्वशक्ती पंपासाठी २५० अश्वशक्तीची १२ पॅनेल तसेच पाच अश्वशक्तीसाठी २० पॅनेल राहणार आहेत. ३६५ दिवसांपैकी सौरउर्जेद्वारे ३०० दिवस दररोज आठ तास कृषीपंपाद्वारे शेतकऱ्यांना ओलिताची सुविधा उपलब्ध होणार आहे. सौरपंपाची कालमर्यादा २० ते २५ वर्षे असल्यामुळे २० वर्ष वीज देयक भरण्याची आवश्यकता राहणार नाही. तीन अश्व शक्तीसाठी शेतकऱ्यांना १६ हजार २०० रुपये सहभाग भरल्यास ३ लक्ष २४ हजार रुपयांचा ३ अश्वशक्तीचा सोलार पंप उपलब्ध होणार आहे.
शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले. प्रारंभी वीज कंपनीचे अधीक्षक अभियंता एस.ए. कांबळे यांनी त्यांचे सौर उर्जा प्रात्यक्षिकाबद्दल माहिती दिली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, कार्यकारी अभियंता व प्रकल्प समन्वयक विजयकुमार उगले, तहसीलदार होळी, तालुका कृषी अधिकारी आर.एस. जावंधिया, वीज वितरण कंपनीचे उपअभियंता पुरी, जतीन पटेल, पंकज वाढण, अमित वागडे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
आठवड्यातून चार दिवस दिवसाला आठ तर ३ दिवस रात्रीला १० तास थ्रिफेज पुरवठा
शेतकऱ्यांना ओलिताकरिता एमईआरसीच्या नियमानुसार आठवड्यातून चार दिवस दिवसाला आठ तास तर तीन दिवस रात्रीला १० तास थ्रिफेज विद्यूत पुरवठा करण्यात येत आहे. या संदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडून कुठल्याही सूचना अल्याशिवाय बदल करता येत नसल्याची माहिती वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता शंकर कांबळे यांनी दिली. यामुळे शेतकऱ्यांकरिता सौर कृषी पंप योजना लाभाची ठरणार आहे. यात शेतकरी त्याच्या गरजेनुसार त्याचा उपययोग करू शकतो.