एनएमएमएस परीक्षेत २३५ विद्यार्थी
By Admin | Updated: February 9, 2016 01:46 IST2016-02-09T01:46:09+5:302016-02-09T01:46:09+5:30
आर्थिक, दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची नववी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत व्हावी,...

एनएमएमएस परीक्षेत २३५ विद्यार्थी
तालुक्यात जि.प.च्या १४ पैकी चार तर खासगी २० शाळांपैकी नऊ शाळा सहभागी
कारंजा (घाडगे) : आर्थिक, दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची नववी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेतर्फे दरवर्षी जानेवारी महिन्यात ‘आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना’ परीक्षा (एनएमएमएस) घेतली जाते. दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांकरिता अत्यंत उपयुक्त असलेल्या या परीक्षेबाबत संबंधीत शाळा आणि शासकीय अधिकाऱ्यांमध्ये उदासीनता दिसून येते. वर्ग आठवीचे विद्यार्थी या परीक्षेला पात्र असतात.
कारंजा तालुक्यात नुकतीच ही परीक्षा घेण्यात आली. संपूर्ण तालुक्यात दोन हजारांहून अधिक आर्थिक दुर्बल विद्यार्थी असून या परीक्षेला मात्र फक्त २३५ विद्यार्थी बसलेत. आठवा वर्ग असणाऱ्या अनुदानित शाळानांच फक्त या परीक्षेला बसता येते. एनसीइआरटी पुणे परीक्षेचे नियंत्रण करते. परीक्षेत पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्ग ९ ते १२ पर्यंतच्या शिक्षणासाठी मदत म्हणून प्रत्येकी प्रत्येक वर्षाला ६००० रुपये शिष्यवृत्ती मिळते. यापूर्वी या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना फक्त नवव्या वर्गाची शिष्यवृत्ती दिली. दहावी व बारावीची शिष्यवृत्ती दिली नाही. म्हणजेच शासनसुध्दा या योजनेबाबत प्रामाणिक नाही, असा आरोप संबंधीत विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे.
कारंजा तालुक्यात आठवा वर्ग असणाऱ्या जि.प.च्या १३ शाळा आहेत. त्यापैकी फक्त चार शाळांनी तर खाजगी २० शाळा आहेत. त्यापैकी नऊ शाळांनी आपले विद्यार्थी परीक्षेला बसविले. यावरून शाळा व्यवस्थापन सुध्दा किती उदासीन आहे हे लक्षात येते. गट शिक्षणाधिकारी उमेकर यांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.(तालुका प्रतिनिधी)