१६ महिन्यांत २२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By Admin | Updated: July 1, 2015 02:33 IST2015-07-01T02:33:14+5:302015-07-01T02:33:14+5:30
जिल्ह्यात असलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे. यात मानसिक संतुलन ढासळल्याने अनेकांनी जीवनयात्रा संपविली आहे.

१६ महिन्यांत २२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
१५ प्रकरणे मदतीस पात्र : सात आत्महत्या अपात्र
हिंगणघाट : जिल्ह्यात असलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे. यात मानसिक संतुलन ढासळल्याने अनेकांनी जीवनयात्रा संपविली आहे. हिंगणघाट तालुक्यात गत १६ महिन्यात एकूण २२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.
जानेवारी २०१४ ते एप्रिल २०१५ या १६ महिन्यांच्या कालावधित या आत्महत्या झाल्याची नोंद शासनदरबारी आहे. यापैकी १५ शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारी मदत जाहीर झाली आहे, तर उर्वरीत सात प्रकरणे मदतीकरिता अपात्र ठरविण्यात आले आहे. या शेतकऱ्यांच्या प्रकरणाची फेरतपासणी करून त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी तालुक्यात जोर धरत आहे.
हिंगणघाट येथे झालेल्या आत्महत्येत २७ ते ३० वयोगटातील चार, ३० ते ४० वयोगटातील सहा, ४० ते ५० गटात चार तर ५० वर्षावरील पाच जणांसह अन्य तिघांचा या आत्महत्येत समावेश आहे.
आत्महत्या केलेल्यात तालुक्यातील लाडकी, शेकापूर, धानोरा, पवनी, शेकापूर, मोझरी, पिंपळगाव, वेणी, निधा, सावली (वाघ), डोरला, डायगव्हाण, काचनगाव, बांबर्डा, आष्टी येथील प्रत्येकी एक जण तर पिपरी दोन जण, कानगाव तीन, अल्लीपूर येथील दोन शेतकऱ्यांचा समावेश आहे.
आत्महत्या झालेल्या २२ शेतकऱ्यांपैकी १५ शेतकरी शासकीय मदतीकरिता पात्र ठरले आहे. या पात्र शेतकऱ्यांना शासनाकडून देण्यात येत असलेली एक लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. यात तालुक्यात आतापर्यंत एकूण १५ लाखांची मदत देण्यात आली आहे. सात प्रकरणे प्रलंबित असून ती मंजुरीकरिता जिल्हा कार्यालयाकडे पाठविली असल्याची माहिती आहे.यावर पुन्हा कोणते ठपके जात वा मदतीस पात्र केले जाते याकडे लक्ष लागलेले आहे.(शहर प्रतिनिधी