214 गावांना पुराचा धोका; लाईफ गार्ड, लाईफ जॅकेटसह रबर बोट आहे तयार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2022 05:00 IST2022-05-26T05:00:00+5:302022-05-26T05:00:11+5:30
पावसाळा सुरु होताच कोठे पूर येऊन गावाला वेढा पडतो, गावातील पूल वाहून जातो, दरडी कोसळतात, रेल्वे मार्गावर अडथळे येतात. नदीकाठच्या गावातील नागरिकांना स्थलांतरित करावे लागते. पुराचे पाणी घरात शिरून नागरिकांचे मोठे नुकसान होते. आपत्तीत सर्व विभागांनी एकमेकांना सहकार्य केल्यास आपत्तीचा सामना सहज करता येईल, असा आशावाद निवासी जिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी व्यक्त केला आहे. आपत्ती निवारण करण्यासाठी आठही तालुकास्तरावर तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.

214 गावांना पुराचा धोका; लाईफ गार्ड, लाईफ जॅकेटसह रबर बोट आहे तयार !
चैतन्य जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : यंदा चांगला मान्सून बरसणार असल्याच्या हवामान विभागाच्या भाकिताने शेतकरी राजा खूश झाला आहे. खरिपाच्या तयारीला तो लागला आहे. महाराष्ट्रात तीन दिवस आधीच मान्सून दाखल होणार असल्याने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झालेली आहे.
जिल्हास्तरावर एक व तालुका स्तरावर आपत्ती निवारण कक्ष स्थापन करुन बचाव पथके नेमण्यात आली आहे. २१४ गावांना पुराचा धोका असून लाईफ गार्ड, लाईफ जॅकेटसह रबरी बोट यासह इतर साहित्यही अपडेट करण्यात आल्याची माहिती आहे. पावसाळा सुरु होताच कोठे पूर येऊन गावाला वेढा पडतो, गावातील पूल वाहून जातो, दरडी कोसळतात, रेल्वे मार्गावर अडथळे येतात. नदीकाठच्या गावातील नागरिकांना स्थलांतरित करावे लागते. पुराचे पाणी घरात शिरून नागरिकांचे मोठे नुकसान होते. आपत्तीत सर्व विभागांनी एकमेकांना सहकार्य केल्यास आपत्तीचा सामना सहज करता येईल, असा आशावाद निवासी जिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी व्यक्त केला आहे.
आपत्ती निवारण करण्यासाठी आठही तालुकास्तरावर तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. बचाव पथकाला प्रशिक्षणही देण्यात आल्याची माहिती आहे. आपत्ती आल्यास सामाेरे जाण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे.
वीज रोधक यंत्रणाही सज्ज
- जिल्ह्यातील तालुकास्तरावर वीज रोधक यंत्रणेच्या माध्यमातून वीज पडणार की नाही, याची तपासणी केली जाते.
- पावसाळ्याच्या दिवसात वीज पडून मृत्यू झाल्याच्या घटनाही घडतात. त्यामुळे तालुकास्तरावर वीज रोधक यंत्रणाही सज्ज झाली आहे.
या ठिकाणी येतो पूर
- पावसाळ्यात जिल्ह्यातील धाम नदी, बोर नदी, भदाडी नदी, यशोदा नदी, शेर नदी, नाला, वाघाडी नाला, पंचधारा धरण, वर्धा नदी, कड नदी, वणा नदी, पोथरा नदी आदींसह नाल्यांना पूर येत असल्याने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती आहे.
बचाव साहित्य खरेदी करणे सुरू
तालुकास्तरावर रबरी बोट, फायबर बोट, लाईफ बॉयज, लाईफ जॅकेट्स, रिफ्लेक्टिव्ह जॅकेट, हेल्मेट विथ टॉर्च, आदी विविध बचाव साहित्याचे वाटप तालुकास्तरावरील बचाव पथकांना देण्यात आले असून उर्वरित बचाव साहित्य खरेदी करण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरू असल्याची माहिती आहे.
तालुका नियंत्रण कक्ष २४ तास अलर्ट
आपत्तीपासून वाचण्यासाठी तसेच आपत्ती आल्यास तत्काळ मदतकार्य पोहचविण्यासाठी तालुका नियंत्रण कक्ष २४ तास अलर्ट ठेवण्यात आले आहे. तशा सूचनाही तालुकास्तरावर देण्यात आल्या आहेत.