जिल्ह्यातील २०० शिक्षक पुण्यातील शिक्षणवारीवर
By Admin | Updated: January 28, 2016 02:11 IST2016-01-28T02:11:33+5:302016-01-28T02:11:33+5:30
राज्य शासनातर्फे प्रगती शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत पुणे येथे शिक्षण जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील २०० शिक्षक पुण्यातील शिक्षणवारीवर
प्रगती शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम : तीन दिवस शाळा सांभाळणाऱ्यांचे होणार हाल
वर्धा : राज्य शासनातर्फे प्रगती शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत पुणे येथे शिक्षण जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातून २०० शिक्षकांचा समावेश असलेली ‘शिक्षण वारी’ बुधवारी जिल्हा परिषदेच्या आवारातून रवाना झाली आहे.
पुणे येथील माळुंगे बालेवाडी येथील छत्रपती संकुलात शासनाने शिक्षण जत्रेचे आयोजन केले आहे. यात नवोपक्रमाचे स्टॉल्स राहणार आहेत. या जत्रेत सहभागी होण्यासाठी सर्व जिल्ह्यांना फर्माण सोडण्यात आले आहेत. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून सुमारे २०० शिक्षक सहभागी होणार आहेत. यासाठी विभागनिहाय नियोजन करण्यात आल्याचीही माहिती सूत्रांनी दिली. या उपक्रमात जि.प. प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांतील शिक्षक सहभागी होत आहेत. जिल्ह्यातील उपक्रमशील शाळांच्या शिक्षकांची यासाठी निवड करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. बुधवारी वर्धेतून निघालेले शिक्षक गुरूवारी शिक्षण जत्रा पाहतील आणि शुक्रवारी परतणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या या नवीन उपक्रमामध्ये जिल्ह्यातील २०० शिक्षक सहभागी होत आहेत. आधीच कल्पक बुद्धीमत्ता लाभलेले हे शिक्षक पुणे येथील शिक्षणवारीत सहभागी होत आणखी नवीन उपक्रमाचे धडे गिरविणार आहेत. तेथून मिळालेल्या नवीन संकल्पनांचा विद्यार्थ्यांच्या अध्यापनात अंतर्भाव करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
अध्यापनावर होणार विपरीत परिणाम
शिक्षणवारीत तीन दिवस सहभागी शिक्षकांची संख्या पाहता कार्यरत शिक्षकांवर ताण वाढून अध्यापन कार्य प्रभावीत होण्याची शक्यता आहे. दूरच्या शाळांतील शिक्षक सहभागी असल्याने बुधवार ते शुक्रवारपर्यंतचे अध्यापन प्रभावित होईल. शेकडो किमीचा प्रवास करून आलेले शिक्षक शुक्रवारी कर्तव्यावर जाऊ शकतील काय, गेलेच तर अध्यापन कार्य करू शकतील काय, हा प्रश्नच आहे.