आगीत १२५ क्विंटल कापूस खाक
By Admin | Updated: February 5, 2016 01:40 IST2016-02-05T01:40:01+5:302016-02-05T01:40:01+5:30
येथील वर्धा-नागपूर मार्गावरील महावितरणच्या जुन्या कार्यालयजवळ नवलचंद चौधरी यांच्या घराला आग लागली.

आगीत १२५ क्विंटल कापूस खाक
सेलू येथील घटना : पाच लाख रुपयांच्या नुकसानीचा अंदाज
सेलू : येथील वर्धा-नागपूर मार्गावरील महावितरणच्या जुन्या कार्यालयजवळ नवलचंद चौधरी यांच्या घराला आग लागली. या घरात कोणी वास्तव्यास नसले तरी शेतातील उत्पादन तिथे ठेवल्या जाते. या आगीत घरात ठेवलेला १२५ क्विंटल कापूस जळून खाक झाला. ही घटना गुरुवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली. यात त्यांचे सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
एमएसईबी कार्यालय दुसऱ्या नव्या ठिकाणी स्थानांतरित झाल्याने या खाली इमारतीचा गोदाम म्हणून वापर सुरू केला. त्या ठिकाणी कापूस व बाजूच्या खोलीत तुरी भरून ठेवल्या आहेत. अचानक आग लागल्याचे समोरच्या गाळ्यातील दुकानदाराचे लक्षात आले. त्यांनी चौधरी यांना व पोलिसांना सुचित केले. ठाणेदार संतोष बाकल यांनी वर्धा येथे अग्निशमन दलास सुचित करून घटनास्थळ गाठले. तत्पूर्वी शैलेंद्र दप्तरी यांनी आपल्या सीडफार्म वरील अग्निशमन यंत्राचा वापर केला; मात्र आगीपुढे त्याचा फायदा झाला नाही. बाजूच्या रहिवाश्यांनी इमारतीवरुन मोटारपंप लावून पाण्याचा मारा करण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाची गाडी पोहचताच काही वेळातच आगीवर नियंत्रण आले. यात १२५ क्विंटल कापूस जळाला. तुरीचे पोते ठेवलेल्या खोलीपर्यंत आग पोहचली नाही. त्यामुळे ते बचावले. शॉट सर्कीटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तविली गेली आहे. या ठिकाणी नगराध्यक्ष डॉ. राजेश जयस्वाल व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. ठाणेदार बाकल यांनी स्वत: अग्निशमन गाडीवर चढून अग्निशमन कर्मचाऱ्यास सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)