१०२२ शेतकऱ्यांचे तीन कोटी रुपये अडले
By Admin | Updated: July 1, 2015 02:32 IST2015-07-01T02:32:14+5:302015-07-01T02:32:14+5:30
शासनाच्या कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना अनुदानावर तुषार व ठिंबक सिंचन संच देण्यात येत असल्याने आर्वी विभागातील १०२२ लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला.

१०२२ शेतकऱ्यांचे तीन कोटी रुपये अडले
कृषी विभागाची दिरंगाई : ठिबक सिंचनाचे अनुदान
श्यामकांत उमक खरांगणा(मो.)
शासनाच्या कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना अनुदानावर तुषार व ठिंबक सिंचन संच देण्यात येत असल्याने आर्वी विभागातील १०२२ लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला. याला वर्षाचा कालावधी लोटत असला तरी या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही. अनुदानापोटी त्यांचे २.८२ कोटी रुपये अडले असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत.
जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. अशात तर त्यांना या अनुदानाची रक्कम मिळाली तर त्यांना सोईचे झाले असते, अशा प्रतिक्रीया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. शिल्लक असलेल्या रकमेचा विचार केल्यास एका शेतकऱ्याच्या वाट्याला सरासरी २७ हजार रुपये येत आहेत. ही रक्कम अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांकरिता मोलाची ठरणार आहे. यामुळे ही रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ देण्यात यावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
शासनाच्या निर्देशानुसार आर्वी उपविभागांतर्गत आर्वी, आष्टी, कारंजा या तीन तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे प्रस्ताव सादर केले. यात आज ना उद्या अनुदान मिळलेच या आशेवर १ हजार २२ शेतकऱ्यांनी रोख रक्कम भरून संच घेत शेतीच्या कामी लावले. याला एका वर्षाचा कालावधी होत असला तरी त्याला अद्यापही अनुदान प्राप्त झाले नाही. या संदर्भात शेतकरी बांधवांना आर्वी कृषी उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे, पण प्रस्ताव वरिष्ठाकडे पाठविले आहे. व पाठपुरावा सुरू आहे, हेच नेहमीचे उत्तर शेतकऱ्यांना ऐकावे लागते.
जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत आहेत. अशात जर शासनाकडून येणार असलेले हे अनुदान मिळाल्यास थोडा आधार होईल, अशी प्रतिक्रीया शेतकरी देत आहे. जवळचा पैसा योजनेचा लाभ घेण्यात खर्च झाल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत.
पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
खरांगणा (मो.)- मोसमी वाऱ्याच्या गत पंधरवड्यात मृगाच्या शेवटी सर्वत्र पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. बियाणेही अंकुरले; परंतु पावसाने पाच साहा दिवसांपासून उघडीप दिल्याने पिके सुकण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळण्याचे संकेत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार प्रारंभीच दमदार पाऊस झाला. यात शेतकऱ्यांनी आर्थिक जुळवाजुळव करून पेरणी केली. पेरण्या आटोपल्या काही प्रमाणात अनेक शेतकऱ्यांना मोडही आली. बियाणे अंकुरले, काही पिके दोन पाणी, चार पाणी झाले; परंतु गत आठवड्यापासून अचानक पाऊस गायब झाल्याने पिके (रोपटी) सुकू लागली आहे. शेतकऱ्यांचे डांळे आभाळाकडे लागले आहे. अशात जर दोन-तीन दिवसात पाऊस आला नाही तर दुबारपेरणीचे संकट शेतकऱ्यावर येणे पक्के आहे. ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी असलेल्या पाण्याच्या आधारावर ओलीत करणे सुरू केले आहे. मात्र पावसाशिवाय पर्याय नसल्याचे दिसून येत आहे.