इंटरनेटवर कुणी अनोळखी माणूस गप्पा मारायला आला तर ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 12:51 IST2020-04-30T08:00:00+5:302020-04-30T12:51:36+5:30
सगळ्यात महत्वाचं म्हणजे घाबरून आईबाबांपासून काहीही लपवायचं नाही. त्यांना सगळं खरंखरं सांगायचं

इंटरनेटवर कुणी अनोळखी माणूस गप्पा मारायला आला तर ?
ऑनलाईन भेटणारी माणसं वाईट उद्देश ठेऊन आहेत हे कसं ओळखायचं तेच कळत नाही. सोशल मीडियावर, गेमिंगमध्ये अनेक जण भेटतात. त्यातला कोण वाईट आहे हे त्कसं ठरवायचं? - निशा देशमाने, डोंबिवली
निशा कोण चांगलं आहे आणि कोण वाईट हे ठरवणं खरंच खूप कठीण असतं. पण काही खुणा असतात, ज्यावरुन आपण सावध होऊ शकतो. त्या कोणत्या?
1) समोरची व्यक्ती आई बाबांचं रुटीन विचारत असेल, त्यांचे मोबाईल नंबर, तुमचा मोबाईल नंबर, तुमच्या घराचं वर्णन विचारत असेल, पत्ता विचारत असेल तर धोका असू शकतो.
2) गप्पा गप्पांमध्ये समोरच्या व्यक्तीने तुम्हाला स्वत:च्या किंवा इतर कुणाच्याशी शरीराचे, विशेषत: खासगी अवयवांचे फोटो काढून पाठवायला सांगितलं तर धोका आहे.
3) आईबाबांना कळू न देता तुम्हाला भेटायला बोलावलं तर धोका आहे. कारण आईबाबांना कळू न देता का भेटायला बोलावेल कुणी? ज्यांचे हेतू वाईट आहेत तेच असं काहीतरी करतील ना?
4) आईबाबांच्या नकळत त्यांचे बँक डिटेल्स द्यायला सांगितले तर धोका आहे.
5) एखाद्या गेमची लिंक शेअर करून तिथलं टार्गेट्स पूर्ण करण्याची चॅलेंजेस दिली तर धोका आहे.
अशावेळी, त्या व्यक्तीचं काहीही ऐकायचं नाही. थेट आईबाबांना सांगायचं आणि सायबर सेल कडे तक्रार करायची. अगदी तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊनही तू किंवा तुम्ही मुलं तक्रार करू शकता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे घाबरून आईबाबांपासून काहीही लपवायचं नाही. त्यांना सगळं खरखर सांगायचं म्हणजे ते मदत करू शकतात.