पांढऱ्या कांद्याने आणले यंदा डोळ्यांत पाणी
By Admin | Updated: April 24, 2017 02:18 IST2017-04-24T02:18:26+5:302017-04-24T02:18:26+5:30
रुचकर, चवदार आणि औषधी गुणधर्मांमुळे पांढऱ्या कांद्याला महत्त्व आहे. मात्र, या वर्षी योग्य भाव मिळत नसल्यामुळे नफा तर सोडाच,

पांढऱ्या कांद्याने आणले यंदा डोळ्यांत पाणी
अंबाडी : रुचकर, चवदार आणि औषधी गुणधर्मांमुळे पांढऱ्या कांद्याला महत्त्व आहे. मात्र, या वर्षी योग्य भाव मिळत नसल्यामुळे नफा तर सोडाच, पण झालेला खर्चही वसूल होतो की नाही, अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे.
भिवंडी, वाडा, वसई या तालुक्यांमध्ये भाताचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. भातपिकानंतर येथील शेतकरी कडधान्ये, फळे व फुलांच्या शेतीसह भाजीपाल्याची शेती करतात. पूर्वी एकमेव भाताचे पीक घेतले जात असे. आता मात्र पांढऱ्या कांद्याला येथील हवामान पोषक असल्याने अनेक शेतकरी त्याची शेती करू लागले आहेत.
वेढे, वेढेपाडा, दुगाड, कोशिंबे, वारेट, झडिके, हिवाळी (भिवंडी), चांबळे, डाकिवली, बिलावली, देवघर, गातेस (वाडा), भिनार, शिरवली, आडणे, भाताणे, वडघर (वसई) या गावांमध्ये पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाते. कांद्याला १० ते १२ दिवसांमध्ये पाणी दिले जाते. त्यामुळे कमी पाण्यात कांदा तयार होत असल्याने शेतकऱ्यांनी कांदा लागवडीस पसंती दिली आहे. कांद्याला शेणखत व रासायनिक खतेही दिली जातात. कीटकनाशके फवारणीसह एका एकराला सुमारे ६० हजार इतका खर्च येतो.
या वर्षी थंडी पडल्याने कांदा पिकावर परिणाम होऊन कांद्याची म्हणावी तशी वाढ झाली नाही. त्यातच, गेल्या वर्षी २५ रु पये प्रतिकिलो असणारा भाव घसरून सद्य:स्थितीत चालू वर्षी निम्म्यावर येऊन १० ते १२ रु पये प्रतिकिलो एवढा झाला आहे, अशी माहिती वेढेपाडा येथील चंद्रकांत भोईर, अशोक लाटे, योगेश लाटे व वेढे येथील आत्माराम पाटील या शेतकऱ्यांनी दिली. (वार्ताहर)