स्रियांनी स्वतःला व्यक्त करण्याची गरज : डॉ. विजया वाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 16:05 IST2019-10-20T16:02:45+5:302019-10-20T16:05:08+5:30
शारदा प्रकाशन आयोजित सोहळ्याला डॉ. विजया वाड उपस्थित होत्या.

स्रियांनी स्वतःला व्यक्त करण्याची गरज : डॉ. विजया वाड
ठाणे : " एकविसाव्या शतकातही पुरुषप्रधान संस्कृतीने स्वतःची पकड़ ढिली होऊ दिलेली नाही . आजही अनेक स्रियांचे चूल ,मूल आणि संसाराचा गाड़ा हाकण्यात उभे आयुष्य खर्ची पड़त आहे . या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून स्रियांनी जिथे जसे जमेल तसे स्वतःला व्यक्त करण्याची आज नितांत गरज असल्याचे प्रतिपादन विश्वकोश निर्मिती मंडळाच्या माजी अध्यक्षा ,सुप्रसिद्ध लेखिका डॉ. विजया वाड यांनी केले .
शारदा प्रकाशन, ठाणे यांच्यातर्फे प्रकाशित झालेल्या चार पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या . मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे येथील सोहळ्यात कवयित्री प्रज्ञा पंडित यांचे 'व्यक्त अव्यक्त ' आणि 'काव्य लिपी' हे काव्यसंग्रह, कवी चारुदत्त मुंढे यांचा 'इंद्रधनुष्य' हा काव्यसंग्रह आणि लेखिका शकुंतला चौधरी लिखित 'आली वादळे तरीही' या कादंबरीचे प्रकाशन कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुप्रसिद्ध लेखिका डॉ. विजया वाड यांच्या शुभहस्ते करण्यात आले. लेखिका डॉ. शारदा निवाते या सोहळ्यास प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे निवेदन कवी मनिष पंडित ह्यांनी केले. याप्रसंगी बोलतांना कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. शारदा निवाते म्हणाल्या की, आजची स्त्री ही माघार घेतांना दिसत नाही. घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर, समाजातल्या रूढी-परंपरांवर ती व्यक्त होते आणि गरज पडल्यास लढतेही ही खरंच स्वागतार्ह गोष्ट आहे. कवीला कोणताही विषय वर्ज्य वाटत नाही किंबहूना आजूबाजूला घडणारी प्रत्येक संवेदनशील घटना कवीच्या जीवाला चटका लावून जाते आणि त्यातूनच कविता जन्माला येते असं ही त्या म्हणाल्या. तीनही लेखकांच्या लिखाणाचं कौतुक करतांना त्या म्हणाल्या की हे लिखाण कुठल्याही महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात यावं इतकं प्रभावी आहे आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचलं पाहिजे. कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. विजया वाड ह्यावेळी बोलतांना म्हणाल्या की आज प्रत्येकानं 'व्यक्त होणं' फार गरजेचं आहे. अव्यक्त राहून आपण मनात बऱ्याच आढ्या घेऊन जगतो आणि त्याचा आपल्याच त्रास होतो. ई-पुस्तके ही आजच्या काळाची गरज असून त्यामुळे जगभरातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं लिखाण पोहोचवता येतं तेव्हा आजच्या प्रकाशन संस्थांनीही त्याकडे सकारात्मकपणे पहावं असंही त्या म्हणाल्या. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या रसिकांचंही त्यांनी मनापासून कौतुक केलं. ह्या वेळी मनोगत मांडतांना प्रज्ञा पंडित यांनी त्यांच्यातील कवी, साहित्यिक कसा आकारास आला हे सांगत त्याचे सर्व श्रेय त्यांच्या वडिलांना दिले. शारदा प्रकाशनच्या संतोष राणे सरांच्या मार्गदर्शनामुळेच माझी पुस्तके आज प्रत्यक्षात उतरली आहेत हे असं ही त्या म्हणाल्या. कवी चारुदत्त मुंढे ह्यांनी आपल्या मनोगतात मोबाईल वापराच्या अतिरेकाबद्दल खंत व्यक्त केली. फक्त वाचाल तर वाचाल असे न म्हणता 'पुस्तके वाचाल तरच वाचाल' असं म्हणण्याची वेळ आली आहे असं ही ते म्हणाले. आपल्या भाषणात लेखिका शकुंतला चौधरी ह्यांनी लहानपणी झालेल्या कीर्तन संस्कारांचा प्रभाव आपल्या विचारांवर आणि लिखाणावर आहे असं सांगितलं. आजवर वाचकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आणि प्रतिसादाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. चांगली प्रकाशन संस्था पाठीशी असल्यानेच आपण वाचकांपर्यंत पोहोचू शकलो असं ही त्या म्हणाल्या. या सोहळ्यात कवी समाधान मोरे यांना 'विश्वविजय' या काव्यसंग्रहासाठी आणि कवी नवनाथ रणखांबे यांना 'जीवनसंघर्ष' या काव्यसंग्रहासाठी 'साहित्यसेवा' पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ऑल इंडिया पोएट्री असोसिएशन आणि तेजस्वी अकॅडेमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय काव्यलेखन स्पर्धेचा बक्षीस समारंभही या सोहळ्यात पार पडला. ह्या वेळी कवी काळूदास कनोजे आणि सचिन गुप्ता हे उत्तेजनार्थ पुरस्काराचे मानकरी ठरले तर कवयित्री कवयित्री सुलभा वासुदेव ढोके-जुवाटकर, शिल्पा नायर आणि किशोरी शंकर पाटील ह्यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची पारितोषिके मिळाली. रसिकांच्या उदंड प्रतिसादामुळे सोहळ्याची रंगत वाढली.