भिवंडी महानगरपालिका मदत करणार का?
By Admin | Updated: September 26, 2015 00:20 IST2015-09-26T00:20:34+5:302015-09-26T00:20:34+5:30
महानगरपालिकेत आर्थिक विवंचना असल्याने शहराच्या विकास कामांसाठी शहरातील लोकप्रतिनिधी राज्य सरकार व केंद्र सरकारकडून मदत मागीत आहेत

भिवंडी महानगरपालिका मदत करणार का?
भिवंडी : महानगरपालिकेत आर्थिक विवंचना असल्याने शहराच्या विकास कामांसाठी शहरातील लोकप्रतिनिधी राज्य सरकार व केंद्र सरकारकडून मदत मागीत आहेत. तर दुसरीकडे विविध कारणे दाखवून नगरसेवकांनी विविध अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मदत देण्याच्या शिफारशी मनपा प्रशासनाकडे केल्या असून प्रशासन ही मदत देणार आहे काय? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
शहरातील कल्याणरोड शफीक कंपाऊण्ड येथे मोती कारखान्यास आग लागून त्यात मालकासह दोन कामगारांचा मृत्यू झाला. या आगीच्या वेळी विहीत मुदतीत अग्निशामक दलाचे कर्मचारी न पोहोचल्याने या घटनेस मनपा प्रशासन जबाबदार असल्याचा ठपका ठेवून वार्ड क्र.३४ चे नगरसेवक दीन मोहम्मद शाह मोहम्मद खान यांनी मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळण्याची मागणी केली आहे. वास्तविक हा मोती कारखाना अवैधरित्या चालत होता,अशी माहिती परिसरांतील नागरिकांकडून मिळते.तसेच प्रभाग समिती क्र.५ च्या कार्यक्षेत्रातील सलीम मंजील परिसरांत मनपाच्या आदेशाने पाणीपुरवठा करणाऱ्या खाजगी टँकरच्या चालकाकडून दोन महिन्यापूर्वी झालेल्या अपघातात इकरा पिर मोहम्मद अन्सारी हिचा दुर्दैवी मृत्यू झाला.त्यांच्या कुटुंबांना मनपाने आर्थिक मदत द्यावी,अशी मागणी प्रभाग समितीच्या सभापती अन्सारी रेश्मा मो.वसीम व वार्ड क्र.११चे नगरसेवक मोमीन परवेज अह.सिराज अह.यांनी केली आहे. वास्तविक मृतांच्या कुटूंबीयांना टँकर मालक व चालकांनी मदत देणे अपेक्षीत आहे. कामतघर येथील वऱ्हाळा तलावाच्या देखभालीसाठी मनपा प्रशासनाने ठेक्याव्दारे सुरक्षारक्षकांची नेमणूक केली असताना तेथे पाय धुण्यासाठी गेलेल्या साकीब मेहबुब शेख व दिपककुमार गुप्ता या दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला. त्या मुलांच्या कुटूंबीयांना मनपाने अर्थिक मदत देण्याची मागणी नगरसेवक कमलाकर पाटील,अन्सारी साजीद हुसैन तफज्जुल हुसैन,अन्सारी नासीर(पप्पू)अब्दुल हक्क यांनी केली आहे. तर वार्ड क्र.३२मध्ये दूषितपाणी पुरवठा झाल्याने बहुसंख्य नागरिकांना जुलाब,उलट्या व ताप या सारख्या आजाराची लागण झाली.त्या काळात मनपा प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे विघ्नेश सुरेश टवटी हा मुलगा दगावला. (प्रतिनिधी)