आम्हाला न्याय कधी मिळणार?
By Admin | Updated: May 13, 2017 00:55 IST2017-05-13T00:55:35+5:302017-05-13T00:55:35+5:30
एकाच्या चुकीचा त्रास सगळ्यांना कशासाठी, आमचा संसार या दुकानांवर होता, आम्ही काय रस्त्यावर दुकाने थाटली नव्हती

आम्हाला न्याय कधी मिळणार?
अजित मांडके ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : एकाच्या चुकीचा त्रास सगळ्यांना कशासाठी, आमचा संसार या दुकानांवर होता, आम्ही काय रस्त्यावर दुकाने थाटली नव्हती, आमची रोजीरोटी होती, पालिकेनेचे आमचे या ठिकाणी पुनर्वसन केले होते, मग कारवाई करताना किमान साहित्य तरी काढण्याची मुभा द्यायला हवी होती, आम्हाला न्याय हवा असल्याचा एकच टाहो गावदेवी भागात उद्ध्वस्त झालेल्या दुकानदारांनी फोडला आहे. अचानक रोजीरोटीच उद्ध्वस्त झाल्याने अनेकांचे डोळे पाणावले होते. त्यामुळे आता हे दुकानदार एकत्र आले असून कायदेशीर बाजू तपासून न्यायालयात जाण्याची तयारी त्यांनी केली आहे.
बुधवारी संध्याकाळी गावदेवी परिसरात कारवाई करायला गेलेले महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांना फेरीवाल्यांकडून जबर मारहाण झाल्यानंतर याची गंभीर दखल पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतली आहे. पालिका अधिकाऱ्यांचे खच्चीकरण करण्याच्या दृष्टीनेच माळवी यांच्यावर पूर्वनियोजित हल्ला असून तो प्रशासनावरच असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर, गुरुवारी सायंकाळी येथील दुकानदारांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता, पूर्वसूचना न देता, २७ दुकानांवर पालिकेने हातोडा टाकला. ही लोकशाही नसून हुकूमशाही असल्याचा आरोप आता पालिका आयुक्तांविरोधात होऊ लागला आहे. १५ ते १८ वर्षांपासून येथे अनेक दुकानदार रोजीरोटी कमवत होते. काहींचे चपलांचे, ज्युसचे, कपड्यांचे, कटलरीचे अशी २७ दुकाने होती. परंतु, गुरुवारी या सर्वच दुकानांवर अचानक रागाच्या भरात आयुक्तांच्या आदेशाने बुलडोजर फिरवला गेला. त्यामुळे आज या सर्वच दुकानदारांचे संसार रस्त्यावर आले आहेत. एकाने चूक केली होती. त्याची शिक्षा त्याला मिळाली आहे. मग, त्याच्या चुकीचे भोग आमच्या माथी कशासाठी, असा सवाल आता या दुकानदारांनी उपस्थित केला आहे. आधीच आम्ही आमची दुकाने रस्ता रुंदीकरणात दिली होती. त्यानंतर, पालिकेनेच या ठिकाणी आमचे पुनर्वसन केले होते. परंतु, अशा हुकूमशाही पद्धतीने कारवाई करायची कशासाठी, असा सवालही आता उपस्थित होऊ लागला आहे. पालिकेच्या या कारवाईमुळे अनेकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. पालिकेने कारवाई करताना किमान नोटीस देणे गरजेचे होते किंवा कारवाई करण्याआधी साहित्य तरी काढायला देणे अपेक्षित होते.
कोणत्याही पूर्वकल्पनेशिवाय अशी कारवाई करून पालिकेला काय मिळाले. त्यामुळे आता आम्हाला न्याय हवा, हे सांगतानाच अनेकांच्या डोळ्यांतील अश्रू अनावर झाले होते. अनेक दुकानदार शुक्रवारी या दुकानांकडे बघून अक्षरश: रडत होते. काहींच्या तर अश्रूंचा बांधच फुटला होता. काहींनी कपाळाला हात मारून, दुकानातील साहित्य शिल्लक आहे का म्हणून, शोधाशोध करीत होते. परंतु, त्यांच्या पदरी निराशाच पडली. त्यामुळेच पालिका आयुक्तांच्या या कारवाईचा निषेध करून शुक्रवारी या दुकानदारांनी बैठक घेतली. या बैठकीत कायदेशीर बाबी तपासून वेळ पडल्यास न्यायालयात जाण्याची तयारीदेखील केल्याचे त्यांनी सांगितले.