मीरा-भार्इंदरमध्ये पाणीटंचाई
By Admin | Updated: March 22, 2017 01:23 IST2017-03-22T01:23:15+5:302017-03-22T01:23:15+5:30
उल्हास नदीत हिरव्या प्रदूषणाचा रंगाचा तवंग पसरल्याने त्याचा फटका मीरा-भाईंदरच्या पाणीपुरवठ्याला बसला आहे.

मीरा-भार्इंदरमध्ये पाणीटंचाई
भार्इंदर : उल्हास नदीत हिरव्या प्रदूषणाचा रंगाचा तवंग पसरल्याने त्याचा फटका मीरा-भाईंदरच्या पाणीपुरवठ्याला बसला आहे. पुरेसे पाणी उचलता येत नसल्याने शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून अजून दोन ते तीन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे उन्हाळा सुरू होतानाच रहिवाशांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
मीरा-भार्इंदर शहराला स्टेमकडून पाणीपुरवठा होतो. उल्हास नदीतून ते पाणी उचलले जाते. पण या पुरवठ्याला जलप्रदूषणाचा फटका बसल्याने जांभूळ येथे स्टेमने नवी जलवाहिनी टाकून तेथूनच पाणी उचलण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे हा फरक पडल्याचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांनी सांगितले.
स्टेममार्फत दररोज ८६ एमएलडी पाणीपुरवठा होतो. त्याचा मुख्य जलस्त्रोत उल्हास नदी असून नदीवर शहाड येथे बंधारा बांधण्यात आला आहे. तेथेच असलेल्या ८० फूट खोल विहिरीतून पाणी उचलले जाते. पुढे ते टेमघर येथील जलशुध्दीकरण
केंद्रात शुध्द केले जाते आणि
वितरित केले जाते. परंतु, उल्हास नदीपात्रातील पाण्यावर २० मार्चपासून हिरव्या रंगाचा प्रदूषित तवंग येतो
आहे. त्यामुळे स्टेमचा पाणीपुरवठा तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आला आहे.
याबाबत चौकशी केल्यावर बंधऱ्याच्या वरच्या बाजुला दीड किलोमीटर अंतरावर जल प्रदूषण झाल्याचे निष्पन्न झाले. स्टेमने ती माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळविल्यानंतर पाण्याचे नमुने तपासणीसाठी नेण्यात आले.
जलप्रदुषणामुळे कोणी बाधित झाल्याची माहिती अद्याप मिळाली नसली तरी त्यावर नियंत्रण ठेवले जात आहे. त्यामुळे सोमवारी दुपारी ३.३० वाजल्यापासुन रात्री ९ वाजेपर्यंंत ५.३० तास शहाडच्या पंपिंग स्टेशनचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. त्यामुळे शहराला ३० एमएलडी पाणीपुरवठा कमी झाला.
प्रदूषण निवळल्यानंतर तो सुरळीत होतो. मात्र त्याचा फटका मीरा-भाईंदरमधील पाणीपुरवठ्याला बसला. (प्रतिनिधी)