जिल्ह्यातील दाेन दिवसांची पाणीकपात रद्द  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 12:32 AM2021-04-18T00:32:07+5:302021-04-18T00:32:21+5:30

नागरिकांना गारेगार दिलासा : सहा महापालिकांसह दोन नगर परिषदांना मिळणार लाभ  

Water cut in the thane district is canceled | जिल्ह्यातील दाेन दिवसांची पाणीकपात रद्द  

जिल्ह्यातील दाेन दिवसांची पाणीकपात रद्द  

Next

- सुरेश लोखंडे
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यात नोव्हेंबर २०२० पासून महिन्यातून दोन दिवस २४ तास पाणीकपात लागू केली होती. यामुळे कोरोनाच्या या संकटकाळी जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगरपालिका आणि अन्य गावपाड्यांना या पाणीसमस्येला तोंड द्यावे लागत होते. मात्र, या चैत्र, वैशाखाच्या कडकडीत उन्हाळ्यात ही पाणीकपात थांबवण्याचा निर्णय घेऊन जिल्हा प्रशासनाने गारेगार दिलासा दिला आहे.


‘पाणीकपात रद्दच्या हालचालींना जोर’ या मथळ्याखाली लोकमतने २६ मार्च रोजी वृत्त प्रसिद्ध करून गृहिणींना दिलासा दिला होता. त्यानुसार प्रशासनाने निर्णय घेऊन महिन्यातील दोन वेळची २४ तासांची पाणीकपात रद्द केली आहे. पावसाळा अवघ्या दीड ते दोन महिन्यांवर आला आहे. याशिवाय जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या आंध्र, बारवी आदी प्रमुख धरणांत पाणीसाठा मुबलक आहे. एवढेच नव्हे तर यंदा प्रारंभापासून दमदार पाऊस पडणार असल्याचे शुभ संकेत हवामान खात्याने वर्तवले आहेत. त्यात कोरोनाचा काळ आणि कडक उन्हाळ्यामुळे जिवाची लाहीलाही होत आहे. घशाला कोरड आणि घामाच्या धारांनी शरीरातील पाणी कमी होण्याचे सध्याचे अनुभव आहेत. परंतु, आता कपात थांबवल्याने नियमित व मुबलक पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


जिल्ह्यातील सर्व महापालिकांच्या शहरांना त्यांचा मंजूर पाणीपुरवठा आता सुरळीत होईल. या शहरांना त्यांचा रोजचा तीन हजार ६२१ दश लक्ष लीटर (एमएलडी) हा मुबलक पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे गृहिणींची पाणीसमस्या आता दूर होऊन त्यांना या कडकडीत उन्हाळ्यात पापड, कुरड्या, शेवया आणि वाळवणासाठी व धुणीभांडीकरिता मुबलक पाणी वापरता येणार आहे. यासाठी मात्र स्थानिक प्रशासनाकडून पाणीपुरवठा यंत्रणेत थातूरमातूर समस्या उद्भवणार असल्याने दक्षता घेणे आवश्यक आहे.

३,६२१ एमएलडी मिळणार पाणी 
ठाणे : जिल्ह्यातील पाणीकपात थांबवल्याने मुंबईसहजिल्हाभरातील दोन कोटी ८० लाख लोकसंख्येला त्यांचा तीन हजार ६२१ एमएलडी हा रोजचा मंजूर पाणी कोटा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्यातील भातसा या सर्वाधिक मोठ्या जलाशयासह बारवी धरण, आंध्रचे पाणी उल्हास नदीद्वारे, मोरबे, पिसे, हेटवणे आदी धरणातून बृहन्मुंबईसह ठाणे, कल्याण - डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी आणि मीरा-भाईंदर या सहा महापालिका, अंबरनाथ, कुळगाव - बदलापूर या दोन नगर परिषदा आणि काही ग्रामीण भागाला पाणीपुरवठा होत आहे. 
एमआयडीसी, एमजेपी, शहाड स्टेमघर प्राधिकरण आदी संस्थांना जिल्ह्यातील शहरांतील दोन कोटी ८० लाख लोकसंख्येला रोज ३,६२२ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा करता येणार आहे. मुंबई  पालिकेला भातसा मोडकसागर, अपर वैतरणा, मध्य वैतरणा धरणातून पुरवठा होतो. ठाणे मनपाला ४२२ एमएलडी पाणीपुरवठा भातसा, शहाड स्टेमघर, एमआयडीसी आणि पिसे धरणातून होतो. नवी मुंबईला ३३० एमएलडी पाणी मोरबे, हेटवणे आणि बारवी धरणातून मिळत आहे.  
कल्याण-डोंबिवली मनपाला २६४ एमएलडी, भिवंडीला २१० एमएलडी, मीरा-भाईंदरला ९१ एमएलडी पाणी शहाड स्टेमघर व एमआयडीसीद्वारे उल्हास नदीतून मिळते. बदलापूरला ३७, अंबरनाथला ५५ आणि उल्हासनगरला १२० एमएलडी पाणी बारवी धरण व उल्हास नदीतून एमआयडीसी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून रोज मिळत आहे. एमआयडीला १६० एमएलडी पाणी बारवीतून मिळते.  बारवी धरणाची उंची दोन मीटरने वाढवली असल्यामुळे या धरणात आता भरपूर पाणीसाठा आहे.

Web Title: Water cut in the thane district is canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.