भावलीच्या पाण्यासाठी शहापूरकरांना प्रतीक्षा
By Admin | Updated: April 1, 2017 05:50 IST2017-04-01T05:50:55+5:302017-04-01T05:50:55+5:30
ठाणे, मुंबईसह अन्यही शहरांना पाणीपुरवठा करण्यासाठी शहापूर तालुक्यात ठिकठिकाणी मोठमोठी

भावलीच्या पाण्यासाठी शहापूरकरांना प्रतीक्षा
ठाणे : ठाणे, मुंबईसह अन्यही शहरांना पाणीपुरवठा करण्यासाठी शहापूर तालुक्यात ठिकठिकाणी मोठमोठी जलाशये व धरणे आहेत. मात्र, या तालुक्याला दरवर्षी तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. या टंचाईवर मात करण्यासाठी नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील भावली धरणाचे ४.५५ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच मंत्रालयात बैठकीत घेतल्याचे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी सांगितले. मात्र, भावली पाणीयोजनेच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असली तरी तो दोन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. यामुळे शहापुरातील ९७ गावे व २५९ पाड्यांना पाण्यासाठी अजून दोन वर्षे प्रतिक्षा करावी लागणार आहे.पाणी आरक्षित समितीचे अध्यक्षपद मुख्यमंत्र्यांकडे आहे. यामुळे या समितीच्या बैठकीत शहापूरच्या पाणीटंचाईवर चर्चा करून भीमनवार यांनी
भावली धरणाद्वारे या टंचाईवर मात करणे शक्य असल्याचे पटवून दिले. यामुळे शहापूर तालुक्यातील पाणीटंचाईला आता कायमचा पूर्णविराम मिळणार असल्याचे भीमनवार यांनी सांगितले. इगतपुरी तालुक्यात भावली-दारणा नदीच्या उगमस्थानी हे धरण आहे.
या धरणाची सुमारे दीड हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठवण क्षमता आहे. हे धरण ५९० मीटर उंचीवर असून शहापूर भागातील गावे व पाडे सुमारे २२० ते ५४० मीटर इतक्या उंचीवर आहेत. यामुळे भावली धरणातून गुरुत्वाकर्षणाने या गावांना पाणीपुरवठा करता येणार आहे.
यासाठी विजेचा एक युनिटही खर्च करण्याची आवश्यकता नाही, असा भीमनवार यांचा दावा आहे. या आरक्षित पाण्यातून माणशी ७० लीटर दरडोई प्रत्येक दिवशी पाणी पुरवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. ही योजना देखभाल व दुरु स्तीच्या दृष्टीने सक्षम होण्यासाठी व्यावसायिक पाणीवाटपाचा उद्देश गृहीत धरण्यात आला आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आदिवासींना कमी दरात पाणी मिळणार आहे. (प्रतिनिधी)