Vidhan sabha 2019 : विधानसभा निवडणुकीच्या उत्सवात कोणाचे बिगुल वाजणार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 12:51 AM2019-09-30T00:51:51+5:302019-09-30T00:53:00+5:30

विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात युती झाल्यास अथवा न झाल्यास काय चित्र राहील. मनसेचे रिंगणात उतरणे कुणाच्या पथ्यावर पडणार आहे.

Vidhan sabha 2019: Who will win assembly election? | Vidhan sabha 2019 : विधानसभा निवडणुकीच्या उत्सवात कोणाचे बिगुल वाजणार ?

Vidhan sabha 2019 : विधानसभा निवडणुकीच्या उत्सवात कोणाचे बिगुल वाजणार ?

Next

- अजित मांडके 

विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात युती झाल्यास अथवा न झाल्यास काय चित्र राहील. मनसेचे रिंगणात उतरणे कुणाच्या पथ्यावर पडणार आहे. एमआयएम मुस्लिमबहुल मतदारसंघात काय चमत्कार घडवणार, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे येत्या काही दिवसांत मिळणार आहे. एक गोष्ट मात्र खरी की, एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात जम बसवण्याकरिता भाजपने पूर्ण ताकद लावली आहे.

विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून येत्या २१ आॅक्टोबर रोजी निवडणुकीचा उत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात आहे. मात्र मागील विधानसभा निवडणुकीत त्यांच्याच मित्र पक्षाने या जिल्ह्यात सेनेला सुरुंग लावला. भाजपला या ठिकाणी जास्त जागा मिळाल्या. त्या खालोखाल शिवसेना आणि राष्टÑवादीचा क्रमांक लागतो. एकेकाळी ठाणे जिल्ह्यावर कॉंग्रेसचे वर्चस्व होते. आजच्या घडीला त्यांचा एकही आमदार जिल्ह्यात नाही. काँग्रेसकरिता ही शोकांतिका आहे. राष्टÑवादीचे नेते गणेश नाईक व अन्य काही मंडळी भाजपमध्ये डेरेदाखल झाल्याने राष्टÑवादीला या निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ठाणे जिल्ह्यावर १९६२ मध्ये कॉंग्रेसचे वर्चस्व होते. काँग्रेसच्या वर्चस्वाला हळूहळू गळती लागली. १९९० नंतर कॉंग्रेस ठाण्यातून हद्दपार झाली. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा अथवा विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला ठाणे जिल्ह्यात भोपळा फोडता आलेला नाही. २०१७ मध्ये झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत ठाणे महापालिकेत कॉंग्रेसचे जेमतेम तीन नगरसेवक निवडून आले. पूर्वी ही संख्या १४ च्या आसपास होती. दोन्ही निवडणुकीत कॉंग्रेसच्या मतांच्या टक्केवारीमध्ये घसरण झाल्याचे दिसून आले आहे. कॉंग्रेसकडे सक्षम नेतृत्व नसल्याचे दिसत आहे. त्याचाच फटका कॉंग्रेसला या विधानसभा निवडणुकीत अधिक बसणार आहे. ठाणे शहरासह जिल्ह्यातील विविध मतदारसंघातून हवश्यागवश्यांनी आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. ठाणे शहर मतदारसंघावरुन तर कॉंग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत मीरा भाईंदर मतदारसंघाच्या बदल्यात ठाणे असे समीकरण कॉंग्रेस आणि राष्टÑवादीमध्ये ठरले होते. मात्र तसे समीकरणच ठरले नसल्याचे कॉंग्रेसचे काही मंडळी सांगत आहेत. त्याचवेळी मीराभाईंदरचा उमेदवारही कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींंकडून अंतिम झाला आहे. त्यामुळे ठाणे मतदारसंघ हा आपसुक राष्टÑवादीकडे जाणार असल्याचे दिसत आहे. मागील निवडणुकीत राष्टÑवादीला येथून २५ हजारांच्या आसपास मते मिळाली होती तर कॉंग्रेसच्या उमेदवाराला १५ हजारांच्या आसपास मते मिळाली होती. दोन्ही काँग्रेसच्या मतांची बेरीज ४० हजारांच्या आसपास जात आहे. अर्थात राजकारणातील अंकगणित इतके सोपे नसते. हा मतदारसंघ खेचण्यासाठी राष्टÑवादीला प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. राष्टÑवादीचे नेते गणेश नाईक यांनी आपल्या कुटुंबासह ५५ नगरसेवकांसोबत भाजपचे कमळ हाती घेतले आहे. उल्हासनगरमध्ये ज्योती कलानी यांनी राष्टÑवादीचा राजीनामा दिला आहे. अशा पध्दतीने जिल्ह्यातील इतर भागातही राष्टÑवादीला उतरती कळा लागली आहे. केवळ मुंब्रा-कळवामध्ये राष्टÑवादी चांगलीच भक्कम असल्याचे दिसत आहे. परंतु ठाण्यात मात्र नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी लोकशाही आघाडीच्या गटनेतेपदाचा राजीनामा दिला असून लवकरच ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. कल्याण डोंबिवलीतही अशाच काही उलथापालथी अपेक्षित आहेत. त्यामुळे या विधानसभा निवडणूक राष्टÑवादीसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. यापूर्वी जिल्ह्यात राष्टÑवादीचे चार आमदार होते, त्याची संख्या आता कदाचित एकवर येण्याची चिन्हे आहेत. केवळ मुंब्रा - कळवा मतदारसंघावरच राष्टÑवादीची मदार असून जितेंद्र आव्हाड येथे करीष्मा दाखवतील आणि राष्टÑवादी जिवंत ठेवतील, अशी शक्यता आहे.

जिल्ह्यात मागील निवडणुकीत भाजपचे सात आणि एक अपक्ष असे आठ आमदार होते तर शिवसेनेचे सहा आमदार होते. मागील निवडणुकीत हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढल्याने शिवसेनेची ताकद काही अंशी कमी झाल्याचे दिसून आले. आता या निवडणुकीत भाजपची ताकद आणखी दोन जागांनी वाढणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांची ही संख्या १० वर जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेत काही मतदारसंघात अंतर्गत कलह निर्माण झाले असून ओवळा-माजिवडा, कल्याण ग्रामीण या मतदारसंघात विद्यमान आमदारांच्या विरोधातच निष्ठावतांनी फळी उघडली असून त्यांनी या दोन्ही मतदारसंघातील विद्यमान आमदारांच्या विरोधात प्रचार न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे या कलहाचा येत्या काळात शिवसेनेला फटका बसू शकतो. ऐरोली आणि बेलापुर मतदारसंघातूनही शिवसेनेची काही मंडळी दावा करीत आहेत. ठाणे शहर मतदारसंघ पुन्हा मिळावा यासाठी शिवसेनेकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे तर मुंब्रा - कळवा मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे. परंतु शिवसेना हा मतदारसंघ सोडण्यास तयार नाही तर भाजप ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे कदाचित या मतदारसंघामध्ये मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता नाकारता येत नाही.

लोकसभा निवडणूक न लढवणाऱ्या मनसेने विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व जागा मनसे लढविणार आहे. यासाठी मनसेकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. काही उमेदवारही अंतिम झाले असून त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. परंतु काही उमेदवार मनसेने गुलदस्त्यात ठेवले असून, युती झाल्याने जे नाराज होतील, त्यांना आपल्या गळाला लावण्याचा विचार मनसे करीत आहे. त्यामुळेच उमेदवारांची नावे अद्यापही अंतिम होतांना दिसत नाहीत. मनसे यावेळी कुणाला फटका देणार, शिवसेना-मनसे आतून समझोता करणार का, मनसेचे उमेदवार रिंगणात उतरवणे ही भाजपची खेळी तर नाही ना, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत.

एमआयएम आणि भारिप बहुजन आघाडी यांनी लोकसभा निवडणुकीत तसा फारसा करीष्मा दाखवला नसल्याने विधानसभा निवडणुकीत काही चमत्कार घडवण्याची शक्यता कमीच आहे. मात्र मुस्लीमबहुल मतदारसंघात एमआयएम काय करते हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
 

Web Title: Vidhan sabha 2019: Who will win assembly election?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.