वास्तू सुसज्ज पण पटसंख्या असमाधानकारकच
By Admin | Updated: September 11, 2015 00:54 IST2015-09-11T00:54:02+5:302015-09-11T00:54:02+5:30
सोयीसुविधांच्या अभावात कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येला गळती लागली असताना सुसज्ज वास्तूसह ई-लर्निंग प्रणाली असूनही विद्यार्थ्यांनी

वास्तू सुसज्ज पण पटसंख्या असमाधानकारकच
- प्रशांत माने, कल्याण
सोयीसुविधांच्या अभावात कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येला गळती लागली असताना सुसज्ज वास्तूसह ई-लर्निंग प्रणाली असूनही विद्यार्थ्यांनी संत रामदास प्राथमिक शाळेकडे पाठ फिरविली आहे. या परिसरात पाच खाजगी शाळा असून त्यांचा परिणाम या शाळेच्या पटसंख्येवर झाल्याचे बोलले जाते.
अटाळी-आंबिवली परिसरात मराठी माध्यमाची ही शाळा आहे. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण या ठिकाणी दिले जाते. १९५३ सालची तिची स्थापना असून एकेकाळी दोन हजारांच्या आसपास असलेली पटसंख्या आजघडीला १५५ पर्यंत घटली आहे. शाळेच्या एक किमी परिसरात अन्य शाळा नसावी, असा नियम आहे. परंतु, हा नियम या ठिकाणीही धाब्यावर बसविण्यात आला असून खाजगी शाळा पाच असल्याने याचा फटका या शाळेच्या पटसंख्येला बसला आहे. येथे मुख्याध्यापकांसह सहा शिक्षक कार्यरत आहेत. इयत्तांचा आढावा घेता पहिली आणि दुसरीत १५, तिसरी आणि चौथीत २४, पाचवीत २५, सहावीमध्ये २२ तर सातवीत ३० विद्यार्थी शिकतात.