दोन बायकांचा दादला गजाआड
By Admin | Updated: January 24, 2017 05:48 IST2017-01-24T05:48:24+5:302017-01-24T05:48:24+5:30
दोन मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करून तिसऱ्यांदा बोहल्यावर चढण्याच्या तयारीत असलेल्या जळगावच्या एका उच्चशिक्षित कुटुंबातील

दोन बायकांचा दादला गजाआड
ठाणे : दोन मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करून तिसऱ्यांदा बोहल्यावर चढण्याच्या तयारीत असलेल्या जळगावच्या एका उच्चशिक्षित कुटुंबातील युवकास ठाणे पोलिसांनी अटक केली. आरोपीला २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ठाण्यातील एक पोलीस अधिकारी मुलीसाठी वर शोधत असताना त्यांना या स्थळाची माहिती मिळाली. नीरजची कौटुंबिक पार्श्वभूमी चांगली असल्याने तो वाईट चारित्र्याचा असेल, याची कल्पनाही त्यांच्या मनाला शिवली नाही. आॅक्टोबर २०१६ मध्ये त्यांनी मुलीचा साखरपुडा नीरजसोबत केला. लग्नाची तारीख १८ जानेवारी २०१७ ठरली होती. परंतु,दरम्यानच्या काळात नीरजच्या कुटुंबीयांनी मुलीच्या पालकांशी संपर्क साधून मुंबईत फ्लॅट देण्याची मागणी केली. आपण स्वत:च कर्ज करून फ्लॅट विकत घेतला असताना जावयाला फ्लॅट कुठून द्यायचा, असा प्रश्न या पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबास पडला. त्यांनी फ्लॅट देण्यास असमर्थता व्यक्त केल्यानंतर नीरजच्या कुटुंबीयांनी विवाह मोडण्याची धमकी दिली. एवढेच काय, साखरपुड्याची छायाचित्रे सोशल मीडियावर टाकून बदनामी करण्याची धमकीही त्यांनी दिली. या प्रकारामुळे त्रासलेल्या या पोलीस अधिकाऱ्याने नीरजची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. त्याने मध्यप्रदेशातील आणखी एका मुलीला अशाच प्रकारे फसवण्याच्या प्रयत्न केला.त्याने केलेली २ लाख रुपयांची मागणी पूर्ण न झाल्याने हा संबंध फसल्याचे चौकशीदरम्यान समोर आले. तीन आठवड्यांपूर्वी या पोलीस अधिकाऱ्याने ठाण्यातील कोपरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. नीरजने ठाण्याच्या न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी त्यांच्या जामिनास विरोध केला. भरीसभर नीरजने सोडलेली नाशिक येथील पत्नी न्यायालयात हजर झाल्याने सरकारी पक्षाची बाजू बळकट झाली. न्यायालयाने नीरजचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानुसार पोलिसांनी निरजला अटक करून, न्यायालयासमोर हजर केले असता त्याला २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. (प्रतिनिधी)