सेंद्रिय शेती कार्यशाळेत दोनशे शेतकरी
By Admin | Updated: September 14, 2016 04:15 IST2016-09-14T04:15:02+5:302016-09-14T04:15:02+5:30
डहाणू तालुक्यातील कोसबाड कृषी विज्ञान केंद्रात आत्मा योजने अंतर्गत दोन दिवसीय सेंद्रिय शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते

सेंद्रिय शेती कार्यशाळेत दोनशे शेतकरी
अनिरुद्ध पाटील , डहाणू/बोर्डी
डहाणू तालुक्यातील कोसबाड कृषी विज्ञान केंद्रात आत्मा योजने अंतर्गत दोन दिवसीय सेंद्रिय शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डहाणू आणि तलासरी तालुक्यातील दोनशे शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला. आत्मा प्रकल्पाचे संचालक चांदवडे आणि कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कृषी विभागामार्फत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) योजना राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत परंपरागत कृषी विकास योजनेतून सेंद्रिय शेतीची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येते. डहाणू तालुक्यातील कोसबाड कृषी विज्ञान केंद्रात ८ व ९ सप्टेंबर रोजी दोन दिवासीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या करिता डहाणू आणि तलासरी तालुक्यातील प्रत्येकी दोन गटांचे मिळून दोनशे शेतकऱ्यांची निवड करण्यात आली होती. आत्मा योजनेचे प्रकल्प संचालक चांदवडे हे प्रमुख मार्गदर्शक होते. या वेळी कोसबाड कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ भरत कुशारे यांनी मशागत, लागवड आणि पीक पद्धतीवर तर उत्तम सहाणे यांनी किडरोगाचे नियंत्रण या विषयी माहिती दिली. प्रशिक्षणाच्या दुसऱ्या सत्रात सेंद्रिय शेतीकरिता उपयुक्त जिवामृत व दशपर्णी अर्क बनविण्याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांंना दाखविण्यात आले. प्राध्यापक अशोक भोईर यांनी खत व माती परीक्षण आणि प्राध्यापक रूपाली देशमुख यांनी सेंद्रिय भाजीपाला व फळांचे दैनंदिन आरोग्यातील महत्व विषद केले. मंडळ कृषी अधिकारी अनिल नरगुलवार यांनी सेंद्रिय शेतीतील विविध योजना समजावून सांगितल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्मा योजनेचे तालुकस्तरीय व्यवस्थापक नामदेव वाडिले यांनी केले. या कार्यशाळेला उपस्थित चार शेतकरी गटांचे गटप्रमुख वसंत कुवरा, किसान धांगडा, रोशन वरखंडे, विजय दळवी आणि उपस्थित दोनशे शेतकऱ्यांंनी या प्रशिक्षणामुळे सेंद्रिय शेतीला गती मिळून भरघोस उत्पन्न मिळेल असा आशावाद व्यक्त केला.